Raj Thackrey News: मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नाशिक शहरात शनिवारी दोन सभा झाल्या. या सभांमध्ये ठाकरे यांनी शरद पवार यांनी राज्यात जातीचे राजकारण आणल्याची टिका केली. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील विना विलंब उत्तर दिले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक येथे आपल्या सभेत राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल निराशा आणि संताप व्यक्त केला. राज्यात जी बंडखोरी आणि सबंध पक्षच ताब्यात घेऊन सत्ता हस्तगत करण्याचे प्रयोग झाले, त्याबद्दल नापसंती व्यक्त केली. यावेळी त्यांनी राज्यात सध्या जाती जातीत भांडणे लावण्याचे राजकारण अतिशय वेगाने पसरत आहे, असे सांगितले.
जातीचे राजकारण महाराष्ट्रात शरद पवार यांनी 1999 मध्ये आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला, तेव्हापासून सुरू झाले आहे. शरद पवार यांना सामान्य जनतेच्या प्रश्नांची काहीही देणे घेणे नाही. ते केवळ जाती जातीत भांडणे लावण्याचे काम करतात, असा आरोप श्री ठाकरे यांनी केला होता.
श्री ठाकरे यांच्या या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक शाखेचे शहर अध्यक्ष बाळा निगळ यांनी विना विलंब उत्तर दिले आहे. श्री ठाकरे यांच्या सभेतील भाषण म्हणजे, गोंधळाचा उत्तम नमुना आहे. ठाकरे यांना आमदारांनी गद्दारी केलेली पसंत नाही. मात्र या गद्दारीला प्रोत्साहन देऊन पन्नास खोक्यांचे राजकारण केलेल्या भाजप विषयी त्यांनी उल्लेख देखील केला नाही.
महाराष्ट्रात जो काही राजकीय गोंधळ सुरू आहे. आमदारांची खरेदी विक्री होत आहे आणि त्यातून सामान्य जनतेच्या मताचा अपमान करण्यात आला. त्या मागे भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्ते करविते आहेत. हे लहान मुलाला देखील माहित आहे. सामान्य नागरिकांना देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या विषयी प्रचंड संताप आहे. मात्र राज ठाकरे यांना त्याचा विसर कसा पडला.
श्री ठाकरे यांनी आपल्या संबंध भाषणात भाजपचं नाव देखील घेतले नाही. यामागे काय गौडबंगाल असावे, असा प्रश्न निगळ यांनी केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, हे समजून घ्यायला प्रदीर्घ काळ लागेल. या महाराष्ट्रात फुले- शाहू- आंबेडकरांची विचारधारा जनसामान्यात रुजविण्याचे काम श्री. पवार यांनी केले.
महिलांना राजकीय आरक्षण तसेच लष्करात प्रवेश, शेतीला कर्जमाफी, पुणे शहराचा विकास, आयटी पार्क, कृषी विषय प्रयोग, फलोत्पादन योजना असे कितीतरी महाकाय प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्याची क्षमता फक्त शरद पवार यांच्यात आहे. मराठवाडा नामांतरापासून महिला आरक्षण आणि विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेले एकमेव नेते शरद पवार आहेत.
शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला जातीयवादी म्हणणे हा स्वतःचाच कोतेपणा दाखविण्याचा प्रयत्न म्हणता येईल. शरद पवार यांनी कधीही जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम केलेले नाही. ते घाऊक कंत्राट भाजप के़ आहे. सध्या राज ठाकरे त्याच भाजपचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्यामुळेच कदाचित भाजपची सोय व्हावी म्हणून ठाकरे यांनी शरद पवार यांना जातीयवादी म्हटले असावे.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.