Balasaheb Thorat News: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकताच धाराशिवसह विविध भागांचा दौरा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी विविध मागण्या केल्या.
राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सामान्य नागरिक देखील अडचणीत आला आहे. त्यादृष्टीने काँग्रेसच्या वतीने विविध नेते नुकसानग्रस्त भागाचा दौरा करीत आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात मराठवाड्याचा दौरा करीत आहेत.
सध्याच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे पंचनाम्यांचा वेळ निघून गेला आहे. आता थेट मदत करण्याची गरज आहे. शासनाने त्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यादृष्टीने निर्णय जाहीर करावा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हट्ट धरून केंद्राकडून राज्याला मदत मिळवावी. केंद्र सरकारने पंजाब आणि अन्य राज्यांना मदत केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यापूर्वी अनेकदा शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत बोलले आहेत. त्यांनी सरकारच्या इच्छाशक्तीचा विषय अनेकदा बोलून दाखवला. आम्ही अनेकदा त्यांची ही भूमिका ऐकली आहे. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी ते कृतीत आणावे, असे आवाहन थोरात यांनी केले.
केंद्र शासनाच्या महसुलात राज्याच्या जीएसटी कराचा मोठा वाटा आहे. त्याचा परतावा देण्यासाठी योग्य वेळ आहे. राज्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना पंतप्रधानांनी मदत करावी. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी देखील केंद्राकडे आग्रह धरला पाहिजे.
या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांकडे हट्ट धरला पाहिजे. पाठपुरावा करून केंद्राकडून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांसाठी मिळाली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपले वजन वापरावे. त्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असे थोरात म्हणाले.
सध्या दुभत्या जनावरांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम काही प्रमाणात सामान्य नागरिकांवर देखील होणार आहे. धाराशिव जिल्ह्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. याबाबत आम्ही शेतकऱ्यांची संवाद साधून दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
सध्याच्या स्थितीत जिल्हाधिकारी यांनी अधिक सक्रिय आणि गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांची त्यात मोठी भूमिका असते. मात्र राज्य सरकार गंभीर असेल तरच ही यंत्रणा गांभीर्याने काम करते. सध्याचे राज्य सरकार शेतकरी आणि अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांबाबत फारसे गंभीर दिसत नाहीत, अशी खंत श्री थोरात यांनी व्यक्त केली.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.