Balasaheb Thorat & Dr Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat Politics : बाळासाहेब थोरातांची खेळी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखेंना मोठा धक्का?

सरकारनामा ब्युरो

Thorat Vs Vikhe News : महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील शह काटशहाचे राजकारण जोमात आहे. त्यात थोरात यांनी आज विखे समर्थकांमध्ये चांगलाच गोंधळ घडवला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राहुरी मतदारसंघात महाविकास आघाडी मजबूत करण्यात मोठे यश मिळवले. येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांची वाट सुकर करण्यात ते यशस्वी झाले.

चाचा तनपुरे या मंत्री डॉ. विखे समर्थक नेत्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. चाचा तनपुरे हे नगरच्या शेवटच्या टोकाला असलेल्या राहुरीच्या राजकारणत प्रभावी नेते म्हणून परिचीत आहेत. ते सातत्याने विखे यांच्या बाजूने राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत देखील विखेंना त्याचा मोठा फायदा झाला होता.

चाचा तनपुरे यांनाच काँग्रेसवासी करण्याची थोरात यांची खेळी त्यामुळे महत्त्वाची आहे. हा भारतीय जनता पक्षासह मंत्री डॉ. विखे यांच्या राजकारणाला धक्का आहे. सध्या थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात देखील थेट उडी घेण्याचा विखे यांचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला महत्त्व आहे.

यावेळी प्रवेश केल्यावर तनपुरे यांनी श्री. थोरात यांनी कायम सर्वांना सोबत घेऊन विकासासाठी काम केले. भाजपाचे लोक अत्यंत सूडबुद्धीने राजकारण करतात. राहुरीच्या विकासात त्यांनी मोठा अडथळा निर्माण केला आहे. यामुळे माझ्यासह राहुरी विकास मंडळाच्या समर्थकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या अतिथी गृहावर काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा विधिमंडळ पक्षाचे नेते थोरात यांच्या उपस्थितीत रावसाहेब उर्फ चाचा तनपुरे यांचा प्रवेश झाला.

यावेळी गोपाळ शेठ अग्रवाल, दिलीप शेठ पारख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, सत्तू नाना पवार, सुभाष वराळे, रामभाऊ बोराडे, मदन शेठ मुथा, अशोक तनपुरे, डॉ. धनंजय मेहेत्रे, ज्ञानेश्वर पोपळघट, सोन्याबापू जगधने, सुनील पवार, वसीम देशमुख, सुरेश कोतकर आदीं उपस्थित होते.

राहुरी हा काँग्रेसच्या विचाराचा राहिला आहे. जिल्ह्यातील प्रगतशील व ९० टक्के बागायत आणि समृद्धी असलेला हा तालुका आहे. इथे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. जेथे कारखाना चांगला तिथली अर्थव्यवस्था चांगली होते, असे आमदार थोरात यांनी यांवेळी सांगितले.

यावेळी थोरात यांनी महसूल मंत्री विखे पाटील यांच्यावर टिका केली. राहुरी कारखाना हा शेतकरी,कामगार, सर्वसामान्य नागरिकांच्या ताब्यात राहावा म्हणून सुरू केला. याउलट गणेश कारखाना आम्ही शेतकऱ्यांची हित व्हावे याकरता सुरू केला. आमचा हेतू प्रामाणिक व स्वच्छ आहे.

सध्या राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. ते जनतेला मान्य नाही. महायुती सरकारकडून हे सातत्याने घडते आहे. भाजपचे दडपशाही आणि दबावाचे राजकारण जनतेला नको आहे. राहुरीच्या विकासासाठी सुसंस्कृत राजकारणाच्या पाठीशी उभे राहून सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात आले. हा विखे यांच्यासह भाजप व महायुतीला मोठा धक्का मानला जातो.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT