Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Assembly Monsoon Session : बाळासाहेब थोरातांचे भुजबळ-भुसेंना चिमटे; ‘तिकडं गेल्यामुळे गप्प बसले, नाहीतर आपण आरडाओरडा केला असता’

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी हा दररोजचा विषय झालेला आहे. अगदी चार चार किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या असतात. मंत्री छगन भुजबळ आणि दादा भुसे हे याच रस्त्याने प्रवास करतात. आता ते गाडीनं, रेल्वेने की विमानाने प्रवास करतात, हे मला माहिती नाही. आपण तिकडं जाऊन बसल्यामुळे गप्प बसले. आज आपण इकडे असता तर आरडाओरडा केला असात, अगदी भुजबळसाहेब आणि तुम्हीसुद्धा, असे म्हणत काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि दादा भुसे यांना चिमटे काढले.

काँग्रेसचे आमदार रईस शेख यांनी आज विधानसभेत नाशिक-मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा उपस्थित केला. त्याला संबंधित मंत्र्यांनी नाशिक महामार्गाची ऑगस्ट २०२४ पर्यंत काम करण्यात येईल, असे उत्तर दिले होते. त्यामुळे बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांनी आम्ही अजून २०२४ पर्यंत त्रास सहन करायचा का, असा सवाल केला. काही मिनिटांच्या अंतरासाठी आम्हाला काही तास वाहतूक कोंडीत घालवावे लागत आहेत.

एकदा मीही वाहतूक कोंडीत अडकलो होतो, त्यावेळी तब्बल दोन तास चालत पुढे गेलो होतो. त्यावेळी त्या वाहतूक कोंडीत दोन रुग्णवाहिकाही अडकलेल्या होत्या. माझ्या मित्राचे घर जवळच असल्यामुळे मी चालत जाण्याचा निर्णय घेतला होता. अशी बिकट अवस्था नाशिक-मुंबई महामार्गाची आहे, असेही थोरात यांनी नमूद केले.

थोरात म्हणाले की, भिवंडी बायपास ते ठाणे या प्रवासामध्ये प्रवाशांना दररोज वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. मी देखील याच रस्त्यावरून प्रवास करतो. जळगाव, धुळे, नगर आणि विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील नागरिक याच मार्गावरून मुंबईत येतात. खड्ड्यांमुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी कायमच असते. वाहतूक कोंडीचा प्रश्न कोणत्याही सबबीवर सोडवावा लागेल. पण, मंत्री म्हणतात की ऑगस्ट २०२४ पर्यंत ही वाहतूक कोंडीची समस्या कायम राहील. मंत्री महोदय असे चालणार नाही हा प्रश्न गंभीर आहे. तुम्हाला तातडीने याच्यावर उपाययोजना कराव्या लागतील.

बाळासाहेब थोरात यांच्यानंतर मंत्री दादा भुसे (Dada bhuse) यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, मुंबई-नाशिक रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा गेल्या आठवड्यात मी स्वतः आढावा घेतला आहे. उपाय योजना ज्या ज्या ठिकाणी कराव्या लागतील, त्या येत्या आठवडाभरात केल्या जातील. तुम्हाला तिथे किमान ५० टक्के बदल झालेला आठवडाभरात दिसेल.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्र्यांना सूचना केल्या. राज्यात अनेक ठिकाणी पायाभूत प्रकल्पांचे काम सुरू आहे. भविष्यात असे पायाभूत प्रकल्प करत असताना आपण पर्यायी व्यवस्थादेखील उपलब्ध करून दिली पाहिजे. त्या संदर्भात भविष्यात आपण काळजी घ्यावी, असे निर्देश नार्वेकर यांनी सरकारला दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT