Aditya Thackrey at Sinner
Aditya Thackrey at Sinner Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aditya Thackrey: दिवाळीच्या रेशन किट पुरवठ्यात मोठा घोटाळा!

Sampat Devgire

सिन्नर : राज्यात मंत्रिमंडळ (Cabinet expansion) विस्ताराची चर्चा सुरू आहे. यातून खातेवाटप होणार. मंत्र्यांना (Ministers) बंगल्यांचे वाटप होणार, पण शेतकरी (Farmers) व कष्टकरी जनतेच्या (Public) समस्यांच्या सोडवणुकीचे काय? खोके घेऊन सत्ताधारी सारे काही आलबेल असल्याचे सांगताहेत, अशी टिका शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी केली. (Shivsena leader Aditya Thackrey visits rain affected farmers in Sinner)

श्री. ठाकरे यांनी काल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन आहीर, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या समवेत सिन्नर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

यावेळी ते म्हणाले, दिवाळीला रेशनवर किट वितरित केले ते सर्वांपर्यंत पोहोचले का? हे किट देण्यासाठी छापलेल्या पिशव्यांवर पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. ते छापण्याची गरज होती काय? हे किट पुरवठ्याचे टेंडर घाईघाईने काढण्यात आले. त्यात मोठा घोटाळा दडला असल्याचा आरोप श्री. ठाकरे यांनी केला.

ते म्हणाले, यंदा संपूर्ण राज्यभर पावसाने सरासरी ओलांडली आहे. दिवाळीचे गोडाधोडाचे दोन घासही शेतकऱ्याच्या घशाखाली जायला तयार नाहीत. अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात असून, सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याची गरज आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप शिवसेनेचे युवा नेते तथा माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे केला.

माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उदय सांगळे, भारत कोकाटे, दीपक खुळे, नीलेश केदार, अरुण वाघ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे बघायला सत्ताधाऱ्यांकडे वेळ नाही. अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करून दिलासा देण्याची गरज आहे. सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असेल, तर विरोधक म्हणून आम्हीही सरकारसोबत राहू. मात्र, खोके बहाद्दरांकडून शेतकऱ्यांना मदत मिळेल ही अपेक्षा नाही, असा टोला श्री ठाकरे यांनी लगावला.

राज्यात सामान्य जनतेचा आवाज दडपण्याचे काम सरकारकडून होत आहे. जगाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून निघणार नाही. मात्र, सरकारकडून दिलासा देणारे शब्दही ऐकायला मिळत नाही, ही शोकांतिका असल्याचे श्री. ठाकरे म्हणाले.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. सरकारकडून केवळ मदतीची घोषणा झाली. शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले हे सर्वजण जाणून आहेत. शेतकऱ्याची समस्या जाणून घ्यायची असेल, तर प्रत्यक्ष बांधावर जाण्याची गरज आहे. मात्र, राज्याला लाभलेले कृषी मंत्री शेतकऱ्यांची अवहेलना करतात. मुख्यमंत्री नेमके कोण हेही समजत नाही. त्यामुळे शेतकरी सैरभैर झाला असून, या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पुढे आली आहे. सध्यास्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकत नसल्याची खंत श्री. ठाकरे यांनी व्यक्त केली.

सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीबद्दल माहिती दिली. सरकारकडून नुकसानभरपाई पोटी मिळणारी मदत तोकडी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT