nilesh lanke | radhakrishna vikhe patil  sarkaranama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe On Nilesh Lanke : मंत्री विखेंचा लंकेंवर कडक प्रहार; 'भाडोत्री लोकांवर उभा केलाय धंदा, वाईट वाटणारच...'

Pradeep Pendhare

Ahmednagar News : भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी माजी आमदार नीलेश लंके यांना नाव न घेता सुप्यामधील (ता. पारनेर) अतिक्रमणाच्या मुद्यावरून सुनावले आहे. "ज्यांनी आपला धंदाच भाडोत्री लोकांवर उभा केला आहे, त्यांना अतिक्रमणाची सुरू असलेली कारवाई वाईटच वाटणार", असा कडक शब्दात मंत्री विखे यांनी लंकेंवर प्रहार केला आहे.

नगर जिल्हा प्रशासनाकडून सुप्या (ता. पारनेर) मधील अतिक्रमणांवर जोरदार कारवाई सुरू आहे. माजी आमदार नीलेश लंके यांच्याजवळच्या लोकांच्या अतिक्रमणांवर देखील हातोडा पडला आहे. तसेच नीलेश लंके यांचे नावाने असलेले संपर्क कार्यालय देखील काल जमीनदोस्त करण्यात आले. या अतिक्रमण मोहिमेवर स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच नीलेश लंके यांच्या पदाधिकाऱ्यांकडून या मोहिमेवर टीका होत आहेत. भाजप (BJP) नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सांगण्यानुसारच ही कारवाई होत असल्याचा सूर नीलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी आवळला आहे.

राधाकृष्ण विखे यांनी यावर आज मौन सोडले. ते म्हणाले, "नगर जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमणं झाली आहेत. जिल्हाधिकारी यांनी याबाबत आराखडा तयार केला. या अतिक्रमणांमुळे गैरसोय वाढली होती. याशिवाय यातून महिला, मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढल्याच्या तक्रारी होत्या. सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढले होते. त्यामुळे प्रशासनाने यावर कारवाई केलीच पाहिजे. यात काही वेगळं म्हणण्याचे कारण नाही". ज्यांनी आपला धंदाच भडोत्री लोकांवर उभा केला आहे, त्यांना वाईट वाटणारच, असा जोरदार प्रहार मंत्री विखे (Radhakrishna Vikhe) यांनी नीलेश लंके यांना त्यांचे नाव न घेता लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वाहतूक कोंडी कायम, कारवाईतून काय साधले...

नगर जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत सुप्या (ता. पारनेर) मधील 300 पेक्षा अधिक अतिक्रमणांवर कारवाई केली आहे. ही मोही दोन दिवसांपासून सुरू आहे. तसेच सुपा एमआयडीसीतील 80 अतिक्रमणांवर कारवाई झाली आहे. यात नीलेश लंके यांचे नाव असलेले जनसंपर्क कार्यालय देखील हटवण्यात आले आहेत.

सुपा येथून नगर-पुणे रस्ता जातो. वाहतुकीला अडथळा येतो म्हणून सुरूवातीला अतिक्रमणे हटवण्यात आली. अतिक्रमण काढल्यानंतरही वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावर वाहनं उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी कायम असल्याकडे स्थानिकांनी लक्ष वेधले. त्यामुळे अतिक्रमण मोहीम राबवून प्रशासनाने नेमकं काय साध्य केलं, हा संशोधनाचा विषय असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT