Mahindra emblem
Mahindra emblem Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News; महिंद्रा इलेक्ट्रिकल प्रकल्पावरून भाजपसह शिंदे गटाची होणार कोंडी

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) महापालिका (NMC) निवडणुकांचा माहोल तयार होत असताना राज्यातील (Maharashtra) सत्ताधारी भाजप (BJP) व शिवसेनेच्या शिंदे गटाला (Eknath Shinde) धक्के बसत आहे. कसबा पोटनिवडणुकीत (Pune) भाजपचा बालेकिल्ला ढासळल्याचा परिणाम नाशिकमध्ये जाणवणार असल्याचे चित्र रंगवले जात आहे. (Nashik is neglected for devolopment by BJP may be the big issue)

पिंपरी चिंचवडा शास्तीमाफीची घोषणा भाजप नेत्यांनी केली आहे. आता महिंद्राचा दहा हजार कोटी रुपयांचा इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्प पुणे येथे होणार असल्याचे उत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्यानंतर त्याचाही परिणाम निवडणुकीत दिसून येईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

त्याचा फटका भाजपसह शिवसेनेच्या शिंदे गटाला बसण्याची शक्यता असून, महापालिका निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा केंद्रस्थानी येण्याची चिन्हे दिसू लागली असून, विरोधी पक्षानीदेखील तयारी सुरू केली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी वेदांता फॉक्स हा दीड लाख कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका झाली. त्यानंतर दाओसच्या माध्यमातून राज्यात १. ३७ कोटी रुपयांची गुंतवणुक होणार असल्याचे जाहीर केले. त्यात नाशिक मध्ये महिंद्रा ॲन्ड महिंद्रा कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रामध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक करणाऱ्या प्रकल्पाचा विस्तार नाशिकमध्ये होणार असल्याचे राज्य शासनाने अधिकृतरीत्या जाहीर केले.

विधी मंडळाच्या अधिवेशनामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून महिंद्र इलेक्ट्रिकल प्रकल्पासंदर्भात विचारणा केल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लेखी उत्तर दिले. नाशिक येथे महिंद्रा ॲन्ड महिंद्रा कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्प होणार नाही.

महिंद्र इलेक्ट्रिक व्हेईकल ऑटोमोबाईल लिमिटेड हा सनराईज सेक्टरमधील प्रकल्प असून, इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मिती हा उच्च तंत्रज्ञानावर आधारित या क्षेत्रातील प्रकल्प आहे. देशांतर्गत इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये १० हजार कोटींची गुंतवणुक असणारा हा पहिलाच प्रकल्प पुणे येथे स्थापित केला जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.

राजकारण रंगणार

नाशिकमध्ये मोठे प्रकल्प गेल्या काही वर्षात आले नाही. दहा हजार कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्पामुळे नाशिकच्या अर्थकारणाला गती मिळेल, असे संकेत मिळत असताना हादेखील प्रकल्प पुणे येथे स्थापित केला जाणार असल्याने नाशिकवर अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊन येत्या निवडणुकीत प्रचाराचा हाच मुद्दा चर्चेत येणार आहे. प्रकल्प स्थलांतरित होण्यावरून भाजपची कोंडी होणार आहे.

विकासासाठी लॉजिस्टिक व आयटी पार्कचे मुद्दे पुढे केले जात असताना दहा हजार कोटींच्या प्रकल्पासंदर्भात भाजपचे आमदार चर्चा करत नसल्याने विकासकामांचा फक्त देखावा असल्याचे बोलले जात आहे.

भाजपसोबतच सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाचीही कोंडी होणार आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगारी कमी करण्याचा दावा, यानिमित्ताने फोल ठरताना दिसतं आहे.

आमदार, खासदारांची चुप्पी

डॉ. भारती पवार यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपद आहे. शहरात भाजपचे तीन आमदार आहे. पालकमंत्रीपद शिंदे गटाकडे आहे, असे असताना या प्रकल्प स्थलांतरित होण्याच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होण्याबरोबरच साधा ‘ब्र' शब्ददेखील न काढल्याने या चुप्पी विरोधकांच्या पथ्यावर पडणार असल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT