Ahilyanagar BJP internal conflict : पश्चिम बंगालमध्ये गेली 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसचे उच्चाटन भाजपने केलं आहे. याचा जल्लोष भाजपचे कार्यकर्ते देशभर करत आहेत. या विजयला पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचे गालबोट लागलं.
तसेच अहिल्यानगरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना हा विजय पचवता आला नाही, अशी कृती केली आहे. पेढा भरवण्यावरून पदाधिकाऱ्यांमध्ये कपडे फाडेपर्यंत मारामारी झाली. पोलिसांपर्यंत हे प्रकरण जाऊन, अब्रू जाऊ नये यासाठी यासाठी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची, हे प्रकरण मिटवता-मिटवता तोंडचं पाणी पळालं. या मारामारीचा किस्सा, आता अहिल्यानगरपासून ते मुंबईपर्यंत पोहोचला आहे.
अहिल्यानगर शहर भाजपच्यावतीने पश्चिम बंगाल (West Bengal), आसाम, पुडुचेरी आणि राज्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अहिल्यानगर शहरातील कापड बाजार इथं भिंगारवाला चौकात भाजपने मिळवलेल्या विजयाचा जल्लोष करताना जोरदार घोषणाबाजी करून नागरिकांना झालमुडी व पेढे वाटप केले.
हा जल्लोष झाल्यानंतर पदाधिकारी लक्ष्मी कारंजा इथल्या भाजप (BJP) कार्यालयात जमा झाले. पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. फटाके फोडले, मिठाई, पेढे वाटप सुरू केले. पेढे नेमके कोणाला भरवायचे, यावरून भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद उफाळला.
या पदाधिकाऱ्यांनी सुरवातील एकमेकांना टोमणे मारले. यानंतर प्रकरण हातावर आले. दोघांनी एकमेकांवर धावत जात, मारामारी सुरू केली. या पदाधिकाऱ्यांना एकमेकांवर, एक प्रकारे जीवघेणा हल्ला चढवला. दोघे ऐकायला तयार नव्हते. दोघांच्या मारामारीमुळे एकच गोंधळ उडाला.
हा सर्व प्रकार शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमोर सुरू होता. जल्लोषात काही महिला पदाधिकारी देखील कार्यालयात आल्या होत्या. या प्रकारामुळे त्या देखील गोंधळल्या. शेवटी दोघांना बाजू करण्यासाठी काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली. यानंतर प्रकरण काहीसे निवळले.
पण दोघेही पदाधिकारी पोलिसांकडे जातील, याची वरिष्ठांना भनक लागली. त्यातून वरिष्ठ पदाधिकारी सावध झाले अन् त्यांनी दोघांची समजूत काढली. यानंतर प्रकरण कुठेतरी शांत झाले. पण या प्रकरणाची अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. आता हे प्रकरण मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
अहिल्यानगर शहर भाजप कार्यकारिणीत गेल्या अनेक दिवसांपासून जुने-नवे, असा वाद धुसफूसत आहे. पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमात जुने पदाधिकारी सहभागी होताना दिसत नाहीत. नवीन कार्यकर्त्यांचाच राबता असतो. यातून हा संघर्ष पेटला आहे. महापालिका निवडणुकीपासून हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
राहुरी विधानसभा निवडणुकीतही जुने पदाधिकारी फारसे सक्रिय नव्हते. प्रचाराचा निरोप नव्हते, असे भाजपच्या जुन्या वरिष्ठांकडून सांगितले जाते. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून या वादाकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता युवा पदाधिकाऱ्यांमधील मारामारीमुळे पक्षशिस्त धाब्यावर बसवली गेल्याचे भाजपमधील जुन्या वरिष्ठांकडून खासगीत सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.