Sujay Vikhe News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe: गावगाडा समजावून घेताना भाजप खासदाराची विरोधकांवर फटकेबाजी

Pradeep Pendhare

Nagar: अयोध्या येथे जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यानंतर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे हे 'गाव चलो अभियानात' सहभागी झाले आहेत. नगर तालुक्यातील वाळकी येथे त्यांनी मुक्काम केला. गावगाडा समजावून घेत असतानाच खासदार विखे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांसह पक्षातील काही जणांवर चौफेर निशाणा साधला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार बाळासाहेब थोरात या विरोधकांवर टीका, तर आमदार राम शिंदे यांच्याशी असलेल्या पक्षातंर्गत वादावर भाष्य केले. संजय राऊत यांचे नाव न घेता मनोरुग्ण कोण आहे हे महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. गेल्या दीड वर्षापासून मनोरुग्णाची लक्षणे कुणामध्ये दिसतात, हे महाराष्ट्राला माहीत आहे, यावर अधिक बोलणार आहे, असे सांगून, उद्धव साहेबांनी पत्रकार परिषद घेतली यात काही नवल नाही. पूर्वी ते फेसबुक लाईव्ह करायचे आणि आता पत्रकार परिषद घेतात. यात काही गांभीर्यासारखे नाही, असे खासदार विखे यांनी म्हटले.

मुंबईच्या दहिसर येथे घडलेली अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांच्यातील वाद हे, दोन व्यक्तीच्या वादातून झालेली घटना आहे, असेही खासदार विखे म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री असे फलक संगमनेरमध्ये झळकले होते. यावर खासदार विखे यांनी यावर फलकांवर झळकणारे पदांपर्यंत पोहोचू शकत नाही, असे टोला लगावला.

सध्या फलक झळकवण्याचे फॅडच आहे. भावी सरपंच, भावी जिल्हा परिषद सदस्य, भावी आमदार, भावी खासदार, भावी मंत्री आणि भावी मुख्यमंत्री,असे फलक लावले जात आहेत. मात्र ज्या ज्या लोकांच्या भावी म्हणून जाहिराती लागल्या ते त्या पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत. असाच माझा राजकीय अनुभव आहे, असे खासदार विखे यांनी म्हटले.

राम शिंदे यांनी पुन्हा खासदारकीच्या लढणार असल्याचे मुद्दा रेटला आहे. यावर खासदार विखे म्हणाले, "पक्षात लोकशाही आहे. तसेच भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षामध्ये अनेक दावेदार आहे. अनेक सक्षम लोक आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. पक्षातील अजून दोन लोकांनी प्रयत्न करावेत. सक्षम लोकं वाढतात, तेव्हा स्पर्धा वाढते. याचाच अर्थ पक्ष वाढत आहे. समोर तर कोणी तिकीट मागत नाही. याचाच अर्थ समोर कोणीच नाही. जी काही स्पर्धा ती भाजपमध्ये आहे. याचाच अर्थ भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सक्षम आहे". उमेदवार सुजय विखे किंवा त्रयस्त व्यक्ती, याला महत्त्व नाही. मोदीजींना पंतप्रधान करण्याचा संकल्प घेऊन आम्ही पुढे गेलो आहोत आणि तो संकल्प आम्ही पूर्ण करणार, असेही विखे यांनी म्हटले.

अयोध्येत अजून विकासकामे सुरूच...

अयोध्याला जाण्याचा योग आला. माता-भगिनींनी जे लाडू बनवले ते रामलल्ला चरणी प्रसाद म्हणून अर्पण केले. अयोध्येमध्ये अजून काही कामे सुरू आहे. रस्त्यांचे काम सुरू आहे. अयोध्येत रोज दीड लाख लोक येत आहेत. प्रसादाच्या लाडूच्या माध्यमातून आमच्या माता-भगिनींच्या मनोकामना पूर्ण होईल, अशी आशा करतो, असेही विखे म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT