Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सोनिया गांधी यांच्याविरुद्धची कारवाई आवडली नाही!

Sampat Devgire

नाशिक : काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्याविरुद्धच्या कारवाईबद्दल बोलताना श्री. भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, की सोनिया गांधी यांच्याविरुद्धची कारवाई मला आवडलेली नाही. दहा वर्षे त्या ‘यूपीए’ सरकारच्या अध्यक्षा होत्या. सध्या त्या विविध आजारांनी ग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत त्यांना त्रास देणे बरोबर नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ म्हणाले. (Chhagan Bhujbal dislikes ED inquiry of Soniya Gandhi)

राज्यातील शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीबाबत ते म्हणाले, राज्यातील सत्तांतरातून अनेक प्रश्‍न तयार झाले आहेत. ‘मुन्नाभाई‘ चित्रपटात अभिनेता संजय दत्त ‘केमिकल लोचा’ झालाय असे म्हणतो, तसे आताच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांमध्ये ‘कानूनी लोचा’ तयार झालाय. विधिमंडळ नेता कुणी निवडायचा? आमदारांनी की पक्षप्रमुखाने? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे मैदानातील लढाई अजून पुढे आहे. मात्र कायद्याच्या लढाईत काय होईल हे सांगता येणे कठीण आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण दिले. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा लढा संपलेला नाही. उलटपक्षी सर्व जिल्ह्यांतील ओबीसींना पूर्ण आरक्षण मिळावे आणि केंद्र सरकारने संविधानिक स्वरूपात सगळ्या जिल्ह्यांत ओबीसींना २७ टक्के आरक्षण द्यावे, यासाठीचा लढा सुरू राहील, असेही ते म्हणाले.

ओबीसी आरक्षणासाठी श्री. भुजबळ यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुंबईहून भुजबळ फॉर्ममध्ये आगमन होताच, जल्लोषात समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशा, फटाक्यांची आतषबाजी करत पेढे भरविण्यात आले.

श्री. भुजबळ म्हणाले, की बांठिया आयोगाच्या अहवालात ओबीसींची संख्या शून्य दाखवली गेली. अशा गावात सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य हे ओबीसी असल्याचे निष्पन्न झाले. त्यासंबंधीची आक्षेप घेण्यात आल्यावर सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करण्यात अडचणी येतील, असे सांगण्यात आल्याने आपण शांत बसलो होतो. खरे म्हणजे, वातानुकूलित कार्यालयात बसून आडनावांवरून ओबीसी ठरवण्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात ओबीसींना आरक्षण मिळावे, ही मागणी कायम राहणार आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्षा ॲड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश नेते नानासाहेब महाले, समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, ॲड. सुभाष राऊत, प्रा. कविता कर्डक, समाधान जेजुरकर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, अनिता भामरे, गजानन शेलार, सुषमा पगारे, संजय खैरनार आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT