Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Onion News: केंद्र शासनाने बंद केलेली कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरु करा

Sampat Devgire

नाशिक : कांद्याच्या (Onion) दरात सातत्याने घसरण होत असून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांदा बाजार भावातील घसरण थांबविण्यासाठी राज्यशासनाकडून (Maharashtra Government) उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. (Chhagan Bhujbal deemands Centre & State Government should starts Onion export scheme)

छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकविणारे राज्य असुन भारतातील एकुण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा ३३ टक्के वाटा आहे. महाराष्ट्रातील सरासरी उत्पादन इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. शिवाय येथील कांद्याची प्रत चांगली असल्याने निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापुर, सातारा, अहमदनगर, धुळे, बुलढाणा आणि जळगांव इ. जिल्हे कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द असुन महाराष्ट्रातील एकुण कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा २९ टक्के वाटा आहे.

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कांदा ह्या शेतीमालाच्या खरेदी - विक्रीसाठी माझ्या मतदारसंघातील लासलगांव बाजार समिती ही आशिया खंडात प्रसिध्द अशी बाजारपेठ आहे. येथे विक्रीस येणाऱ्या एकुण आवकेपैकी ८५ ते ९० टक्के आवक ही कांदा ह्या शेतीमालाची असते. सर्वसाधारणपणे हा कांदा नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार व औरंगाबाद या सहा जिल्ह्यातून विक्रीस येतो. आलेल्या कांदा आवकेपैकी ७० ते ८० टक्के कांदा हा निर्यातयोग्य असतो. नाशिक जिल्ह्यातील लासलगांवसह इतर सर्व बाजार समित्या या प्रायमरी मार्केट असल्याने येथे फक्त शेतकरी बांधवांचाच शेतीमाल विक्रीस येत असल्याचे म्हटले आहे.

सद्यस्थितीत रब्बी (उन्हाळ) कांद्याची विक्री सर्वसाधारण सरासरी आठशे रूपये क्विंटलप्रमाणे होत आहे. गेल्या १५ दिवसातील कांदा बाजारभावाचा विचार करता बाजारभाव स्थिर असल्याने सध्या मिळत असलेल्या बाजारभावात येथील शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च मिळणेही अवघड झालेले आहे. तसेच यावर्षी गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगाल या राज्यांसह महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापुर या जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी घटलेली आहे.

त्यातच बांगलादेशने कांदा आयातीवर निर्बंध टाकल्याने व श्रीलंकेत आर्थिक परीस्थिती निर्माण झाल्यामुळे कांद्याची निर्यात ठप्प झालेली आहे. भारताच्या या दोन्ही प्रमुख आयातदार देशांमध्ये भारतीय कांदा निर्यात होत नसल्याने मागणी अभावी कांद्याची बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. कांदा बाजारभावात घसरण अशाचप्रकारे सुरू राहील्यास केंद्र शासनाच्या ध्येय धोरणांबाबत शेतकरी बांधवांमध्ये असंतोष निर्माण होऊन आंदोलने होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या बाजार समित्यांमध्ये विक्रीस येत असलेला रब्बी(उन्हाळ) कांदा जास्तीत जास्त प्रमाणात परदेशात निर्यात होणेसाठी कांदा निर्यातीस चालना देणेकामी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी कांदा निर्यातदारांकरीता केंद्र शासनाने यापूर्वी लागू केलेली दहा टक्के कांदा निर्यात प्रोत्साहन योजना ११ जून २०१९ पासुन बंद केलेली आहे. सदरची योजना पुन्हा सुरू करणेत यावी. बांगलादेशला कांदा निर्यात पुर्ववत सुरू होणेसाठी प्रयत्न करून तेथे रेल्वेद्वारे कांदा पाठविणेसाठी असलेली कोटा सिस्टीम संपुष्टात आणावी व बांग्लादेशसाठी येथील निर्यातदारांना पाहिजे त्या प्रमाणात व वेळेत पाठविणेसाठी किसान रेल किंवा बीसीएनच्या हाफ रॅक देण्याबाबत रेल्वे प्रशासनाने निर्णय घ्यावा.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT