Chhagan BHujbal
Chhagan BHujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भुजबळांची भरणेंना साद, तुमचा आमचा एक आवाज!

Sampat Devgire

नाशिक : ओबीसींमध्ये (OBC) धनगर समाज हा महत्वाचा घटक आहे. धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे अशी मागणी आहे. परंतु सध्या ओबीसी आरक्षणावर (OBC reservation) गदा आली आहे. या लढाईत सामील व्हावे. आरक्षणाची लढाई लढायची असेल तर त्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

पुण्यश्लोक फाउंडेशन आयोजित हिंदुस्थानचा युगपुरुष श्रीमंत सुभेदार 'मल्हारराव होळकर' जन्मोत्सव सोहळा मंत्री छगन भुजबळ व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी श्री. भुजबळ यांच्या हस्ते श्री. भरणे यांचा नागरी सत्कार झाला. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचा महाराष्ट्राबाहेर विस्तार करण्यात सिंहाचा वाटा असणारं नाव सुभेदार मल्हारराव होळकर याचं होत. अवघ्या वीस वर्षांतच मल्हाररावांनी ७४ लक्षांचा मुलुख ताब्यात घेतला. उत्तर भारतात मराठी सत्तेचा विस्तार करुन मराठी साम्राज्य निर्माण केले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात लहान मोठ्या एकंदर ५२ लढायांत भाग घेतला. ते फक्त युद्ध कलेत निष्णात नव्हते तर,राजकारण व राज्यकारभारातही चाणाक्ष होते. पेशव्यांच्या दरबारात त्यांना वडीलकीचा मान होता.

ते पुढे म्हणाले की, रत्नपारखी नजर असलेल्या मल्हाररावांनी आपला मुलगा खंडेराव यांचा विवाह चौंडीचे माणकोजी पाटील यांची कन्या अहिल्याबाई यांचेशी केला. कुंभेरीच्या लढाईत खंडेरावांचा मृत्यु झाल्यानंतर अहिल्यादेवी सती जायला निघाल्या होत्या. परंतु मल्हाररावांनी त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले. आता तु माझी सुन नसुन माझा मुलगा खंडुच आहे. कसे म्हणून राज्याची सर्व धुरा अहिल्यादेवींकडे सोपवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या पराक्रमाने ऊभे केलेले स्वराज्य निष्ठेने वाढविण्याच्या कामी त्यांच्या अर्धशतकाची कारकिर्द सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखी आहे.मल्हाररावांनी आपले सर्वस्व पणाला लाऊन मराठा साम्राज्याच्या सीमा सिंधू नदीपर्यंत वाढविल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री भुजबळ यांनी धनगर समाजाच्या योगदानाचा आदरपुर्वक उल्लेख केला. ते म्हणाले, माझ्या राजकीय जडणघडणीत धनगर समाजाचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. ओबीसी प्रश्न आला की तुमचा आमचा आवाज एक असला पाहिजे. ओबीसी समाजातील जाती आणि पोटजातींनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. राज्यातील ५४ टक्के समाज एकत्र आला तर राज्याचे आणि देशाचे चित्र वेगळं असेल. धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत आपण मंत्रिमंडळात मांडून ती सोडविली जाईल. समाजात फूट न पाडता एकत्रित येऊया असे त्यांनी सांगितले. तसेच चांदवडच्या रंगमहालाचे काम पर्यटन मंत्री असतांना सुरू केले आहे, लवकरच या कामाचा आढावा घेऊन उर्वरित काम मार्गी लावले जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी माजी आमदार हरिदास भदे, प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, दत्तू बोडके, पत्रकार धंनजय तांदळे, समाधान बागल, शिवाजीराव ढेपले, गणपत कांदळकर, शिवाजी सुपनर, आनंदा कांदळकर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT