Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते छगन भुजबळ हे काही दिवसांपासून पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रिपदासाठी पत्ता कट करण्यात आल्यानंतर त्यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट टार्गेट करत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
अशातच आता छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी बुधवारी (ता.5) सकाळी भेट घेतली. या भेटीनंतर थोड्याच वेळात त्यांनी फडणवीसांकडे महाविकास आघाडी सरकार सुरू झालेली 10 रुपयांत शिवभोजन थाळी ही योजना कायम ठेवावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील गोरगरीब गरजू नागरिकांसाठी राज्यात शिवभोजन थाळी योजना सुरु करण्यात आली होती.आता ही योजना देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये बंद होणार असल्याची चर्चा आहे. यापुढील काळातही पूर्ववत सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, राज्यातील गोरगरीब गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी योजना सुरु करण्यात आली होती. आता ही योजना बंद होणार असल्याची चर्चा आहे. शिवभोजन थाळीसाठी वर्षाला जवळपास 267 कोटी खर्च येतो.पण या योजनेमुळे भुकेलेल्यांना वेळेवर दोन घास मिळतात ही समाधानाची बाब असल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
तसेच शिवभोजन थाळी ही योजना पूर्ववत सुरु ठेवावी.सरकारच्या दृष्टीने भुकेलेल्यांच्या पोटासाठी 267 कोटी हा खर्च तसा नगण्य आहे.त्यामुळे राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक पुनर्विचार करून शिवभोजन थाळी ही योजना पूर्ववत सुरु ठेवावी,अशी मागणीही माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे.
छगन भुजबळ यांनी बुधवारी(ता.5)सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.त्यांनी अर्धा तास मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. ते म्हणाले,मी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो, याच खरं कारण म्हणजे त्यांच्याकडे गृहमंत्रालय सुद्धा आहे,आणि आमच्या येवला पोलिसांना कवायत ग्राऊंडला भिंत टाकायची आहे, येवला पोलीस स्टेशनच्या पोलिसांसाठी घरं पाहिजे आहेत. आणि जादा पोलीस फोर्स पाहिजे.
आमच्या इतर काही फायली देखील आहेत, उदाहरणार्थ आमच्या लासगाव कमिटीचं थोडं काम आहे. एस गाववरून आम्हाला येवल्याला पाणी आणायचं आहे. त्याची फाईल आहे. हे मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी पडून आहे. त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. बाकी राजकारणावर चर्चा करण्याचं काही कारण नाही,राजकारणावर काय चर्चा करणार? असंही भुजबळ यांनी म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.