Chhagan Bhujbal Welcomes Caste Census Decision : केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी नेत्यांकडून त्याचं स्वागत केलं जात आहे. महाराष्ट्रातील ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. भुजबळांनी या निर्णयावर सामाजिक न्यायाच्या लढ्याला ऐतिहासिक यश आल्याचं म्हटलं आहे.
तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी जनगणनेत जात हा विषय नव्हता. पण आता जातनिहाय जनगणनेचा विषय मंजूर झाल्याने एका कमांडवर देशभरातली ओबीसी समाजाची लोकसंख्या हातात येणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.
या निर्णयासंदर्भात बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, 2011 च्या जनगणनेत जातीचा कॉलम नव्हता, आता तो कॉलम अॅड केला आहे. तसेच जातनिहाय जनगणनेसाठी आपण 20 वर्षांपासून आवाज उठवला, सन २०१० मध्ये समता परिषदेने याच मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, अशी आठवण भुजबळांनी सांगितली. मात्र, भुजबळांच्या या भूमिकेवर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी टीका केली असून आक्षेप घेतला आहे.
जातिगत जनगणनेबाबत छगन भुजबळ धांदात खोटे बोलत असल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे. 2011 ची जनगणना झाली, तेव्हा सुद्धा जातीचे कॉलम होते. तसेच, सन 2011 मध्ये ग्रामीण विभागाकडून झालेल्या जनगणनेसाठी पूर्ण देशामध्ये 20 हजार कोटी रुपये खर्च झाल्याची कबुली केंद्र सरकारने लोकसभेमध्ये दिली होती.
त्यावेळेस जातिगत जनगणना झाली होती परंतु काही तांत्रिक कारणामुळे तो डाटा व्यवस्थित जमा झाला नाही असे सांगून तत्कालीन सरकारने एस.टी आणि एस.सी. सोडून इतर जातीची जनगणना आम्ही सार्वजनिक करणार नाही असं स्पष्ट केलं होतं. असं वास्तव असताना मंत्री छगन भुजबळ हे कसे काय सांगत आहेत की, 2011 च्या जनगणनेमध्ये जातीचा कॉलम नव्हता आणि आता जातीचा कॉलम आहे, असा सवाल ओबीसी नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी उपस्थितीत केला.
छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते असूनही पूर्णपणे भाजपकडे झुकल्याचे दिसत आहे. यापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींचे बरेच नुकसान केले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात असाही निर्णय घेण्यात आला की, एस. ई .बी .सी असा कोणताही प्रयोग नसताना कायद्याद्वारे मराठा समाजाला ओबीसी म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे ओबीसींचे मोठे नुकसान झाले.
सन 2011 मध्ये जनतेची जी फसवणूक झाली तीच फसवणूक आत्ताचे सरकार करत असल्याचा आरोप राठोड यांनी केला. ओबीसींची वारंवार फसवाफसवी करणे थांबवावे अन्यथा एक दिवस ओबीसी नक्कीच जागा होईल आणि भारतीय जनता पार्टीला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. ओबीसींना आपण किती दिवस फसवणार आहात, असा सवाल हरिभाऊ राठोड यांनी केला.
भुजबळांकडून पीएम मोदींचे आभार
दरम्यान, एका कार्यक्रमात मंत्री भुजबळांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
भुजबळ म्हणाले, समता परिषदेच्या स्थापनेनंतर ज्या-ज्या ठिकाणी आम्ही ओबीसी मेळावे घेतले त्या ठिकाणी आम्ही जातनिहाय जनगणना करा अशी मागणी केली होती. परंतु ज्या-ज्या वेळेला ओबीसी समाजाला काही द्यायचे असते, त्या-त्या वेळी कोणीतरी कोर्टात जाते. मग कोर्ट विचारते ओबीसींची नेमकी संख्या किती आहे?
यापूर्वी 1931 मध्ये जातनिहाय जनगणना झालेली आहे. त्यावेळी ती 54 टक्के लिहिली आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. तसेच, कोर्ट नेहमी विचारते आता ओबीसींची लोकसंख्या किती आहे ते सांगा. त्यामुळे, आमची मागणी सातत्याने होती, आहे. जातनिहाय जनगणना होते आहे, अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचं भुजबळ म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.