Ganpat Gaikwad, Chhagan Bhujbal, Abhishek Ghosalkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : फारच भयानक चाललंय खरं, तरीही गृहमंत्री जबाबदार कसे?

Arvind Jadhav

Nashik Political News :

राज्यात राजकीय नेत्यांकडून किंवा राजकीय नेत्यांवर गोळीबार सुरू झाला आहे. 2 फेब्रुवारीला भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर काल रात्री (8 फेब्रुवारी) दहिसरमध्ये मॉरिस नोरोन्हा यांनी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. यावर राज्याते मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

काही तरी वादात गोळीबार करणे आणि फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच पिस्तूल काढून एकाने दुसऱ्याची हत्या (Crime) करणे या घटना फारच भयानक आहेत. विश्वास तरी कोणावर ठेवायचा? डोकं चक्रवणाऱ्या घटना समोर आल्या असून, तरुण, सुशिक्षित आणि उमद्या व्यक्तीची हत्या होणे, याचे फारच वाईट वाटते, अशी उद्विग्न प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली. त्याचवेळी अशा घटनांसाठी गृहमंत्री जबाबदार असू शकत नाही, या शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पाठराखण केली.

'मी व्हिडिओ पाहिला. मलासुद्धा खूप वाईट वाटले. शिकलेला आणि उमदा तरुण होता, पण दुर्दैवी घटना घडली. मॉरिसने स्वत:वर गोळी झाडून घेतली. फेसबुक लाइव्ह चालू असताना अचानक पिस्तूल काढून सटासट गोळ्या झाडल्यात. लोकांच्या डोक्याला झालंय काय?' कल्याणमध्येही भावाभावात गोळीबार झाला. दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत; मग कोण कोणावर दबाव टाकत होता आणि त्यांच्यात हा वाद काय होता, हा तपासाचा भाग असल्याचे भुजबळ म्हणाले.

गृहमंत्री जबाबदार कसे?

सततच्या गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप होत असून, पोलिस आणि गृहमंत्र्यांच्या भूमिकेवर विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीसुद्धा विरोधक करत आहेत. त्यावर मित्र आणि नातेवाइकांकडून झालेल्या गोळीबारांसाठी गृहमंत्री जबाबदार कसे, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

गोळीबाराच्या घटनानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांना घेरले आहे. ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) मॉरिस याचे मुख्यमंत्र्यांबरोबर असलेले छायाचित्र प्रसिद्ध केले. कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांनी गृहमंत्र्यांची पाठराखण केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

समाजात गुंडागर्दी वाढली, आतंकवाद असेल, चोऱ्यामाऱ्या, दंगली या पार्श्वभूमीवर गृहमंत्री पोलिसांना निर्देश देऊ शकतात. मात्र, अगदीच नातेवाइकांमध्ये वा एकाच ठिकाणी बसलेल्या ओळखीच्या दोघांमध्ये गोळीबार झाला, तर त्यासाठी गृहमंत्री जबाबदार असू शकत नाहीत, असे भुजबळ म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मॉरिसकडे पिस्तूल कसे?

गोळीबाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पिस्तूल परवाना आणि त्याचे नियम याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पिस्तूल परवाना देण्याचे नियम आणखी कडक करण्याची आवश्यकता असेल तर ते करायला हवेत. तसेच ज्या व्यक्तींकडे परवाना असलेल्या पिस्तूल आहेत, त्यांच्याकडे पोलिसांनी लक्ष द्यायला हवे.

परवानाप्राप्त बंदूक असलेला व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा वा काही धोका उत्पन्न करण्याची शक्यता असल्यास त्यांचे शस्त्र पोलिसांनी जमा करून घ्यायला हवेत, असे भुजबळांनी सुचवले आहे. मॉरिस कोणत्यातरी गुन्ह्यात जेलमध्ये जाऊन आला होता. त्यामुळे त्याच्याकडे पिस्तूल कसे आले, याची मला कल्पना नाही, असेही ते म्हणाले.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT