BJP leader Chitra wagh
BJP leader Chitra wagh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chitra Wagh; गर्दी नसल्याने चित्रा वाघ पदाधिकाऱ्यांवर संतापल्या!

Sampat Devgire

धुळे : भाजपच्या (BJP) प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra wagh) यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याला अपेक्षित गर्दीच झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या वाघ यांनी उपस्थित महिला (Womens) पदाधिकाऱ्यांची जाहीर हजेरी घेतली. सभागृह भरले नाही म्हणून नाराज व संतापलेल्या वाघ यांनी सगळ्यांनाच खडे बोलही सुनावले. त्यामुळे त्यांचा हा मेळावा चांगलाच चर्चेचा विषय ठरला. (Women office bearers absent for Chitra wagh programme)

यावेळी त्यांनी शिरपूर, साक्री, शिंदखेडा येथून किती महिला उपस्थित आहेत, अशी विचारणा केली. त्या वेळी मोजक्याच महिलांनी हात उंचावल्याने श्रीमती वाघ संतापल्या. संबंधित तालुक्यांच्या मंडल अध्यक्षा कोण आहेत, याची माहिती त्यांनी घेतली, तर काही मंडल अध्यक्षा मेळाव्यास अनुपस्थित असल्याची माहिती मिळाली. व्यासपीठावर उपस्थित प्रत्येक महिला पदाधिकाऱ्याने किमान २५ महिला कार्यकर्त्या आणल्या असत्या तर सभागृह भरले असते, अशी खंतही श्रीमती वाघ यांनी व्यक्त केली.

या मेळाव्यात त्या म्हणाल्या, गेल्या अडीच वर्षांत आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावली, रस्त्यावर उतरून आंदोलने केली. आता सत्ताधारी पक्षात असल्याने जबाबदारी आणखी वाढली आहे. पक्षात पदे हवी असतील तर रस्त्यावर उतरून पक्षाचे काम करावे लागेल. यापुढे केवळ पक्षासाठी झटणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनाच निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल,

शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरात भाजपच्या विभागीय महिला मेळाव्यात श्रीमती वाघ बोलत होत्या. यावेळी विविध पदाधिकारी उपस्थित होत्या. त्यांनी पक्षाच्या महिला आघाडीचा विस्तार केला जाईल. महिलांना सक्षम कार्यकर्त्या करण्यावर भर असल्याचे सांगितले.

यावेळी त्या म्हणाल्या, की पक्ष-संघटनेत प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडणाऱ्या महिलांनाच निवडणुकीत उमेदवारी मिळेल. त्यामुळे पक्षासाठी कठोर मेहनत करण्याची तयारी ठेवावी. राजकारणात कोणताही शॉर्टकट नसतो. मेहनत केल्यास पक्ष जबाबदारी देतो. शिंदे-फडणवीस सरकारच्या लोककल्याणकारी योजना घराघरांत पोचवा. केंद्रातील जनहितार्थ योजनांची माहिती तळागाळापर्यंत जायला हवी.

यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे म्हणाले, की केंद्र सरकारने महिलांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील महिलांचे दुःख जवळून पाहिल्यामुळे उज्ज्वलासारखी योजना राबविली. तसेच सैनिकी विद्यालयांमध्ये मुलींना प्रवेश देणे सुरू केले.

यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रदीप कर्पे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पवार, जिल्हा परिषद सदस्या धरती देवरे, राज्य कार्यकारिणी सदस्या डॉ. माधुरी बाफना, मोर्चाच्या शहराध्यक्षा मायादेवी परदेशी, जिल्हाध्यक्षा सविता पगारे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT