Bhaskar Bhagre News: नीट प्रश्नपत्रिका फुटल्याने दिल्लीत सीजेपी पक्षाचे आंदोलन झाले. हे आंदोलन चिरडण्यासाठी सत्ताधारी भाजपने अनैतिक व धक्कादायक गैरप्रकार केले. त्यासाठी जबाबदार मंत्र्यांवर कारवाई करावी.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे आक्रमक आहेत. आज पासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. यावेळी विद्यार्थ्यांवर झालेला सरकार पुरस्कृत गुंडांचा अत्याचाराचा प्रश्न उपस्थित केला जाईल.
खासदार भास्कर भगरे यांनी भाजप सरकारने केलेले गैरप्रकार व आंदोलकांवरील अत्याचार धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. आंदोलनादरम्यान जंतर-मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. आंदोलनास भेट दिली.
यावेळी आपल्याला धक्कादायक प्रकार दिसले. गुन्हेगार तसेच गुंडांचा जंतरमंतर येथे मुक्तपणे संचार होता. पोलीस त्यांना पूर्णपणे सहकार्य करीत होते. या गुंडांकडे लाठ्या आणि अन्य अवजारे होती. विद्यार्थी हे राष्ट्राचे भवितव्य आणि भविष्य असते. परीक्षेतील गैरप्रकारांनी त्यांचे भवितव्य संकटात गेले आहे. ही मुख्यता सरकारची जबाबदारी आहे. त्याकडे विद्यार्थ्यांनी आंदोलनाद्वारे लक्ष वेधले.
या चळवळीला केंद्रातील भाजप सरकारने नकारात्मक आणि शत्रू सारखी वागणूक दिली. पोलीस पुरस्कृत गुंडांनी विद्यार्थ्यांवर अत्याचार केले. मारहाण केली. हा प्रश्न गंभीर असल्याने संसदेच्या अधिवेशनात त्यावर आपण सभागृहाचे लक्ष वेधणार आहोत.
विद्यार्थी आंदोलन आणि ते हाताळताना सरकारला आलेले अपयश हा गंभीर विषय आहे. त्यावर संसदेत चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने संधी मिळाल्यास आपण हे गैरप्रकार उघड करू, असा इशारा खासदार भगरे यांनी दिला आहे.