Climate Change
Climate Change Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Envirnment Alarm; राजकीय नेतृत्व केव्हा जागे होणार?...निसर्गाचे संकेत ओळखा!

Sampat Devgire

डॉ. राहुल रनाळकर

कधी नव्हते एवढे तापमान (Climate Change) यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात अनुभवण्यात आले. आजवरच्या तापमानाचा (Temprature) उच्चांक या महिन्यात झाला. उच्च तापमानानंतर थोडाफार अवकाळी पाऊस (Pre monsoon) कोसळतो. ते निसर्गचक्र (Envirnment) देखील म्हणता येईल. बेमोसमी पाऊस, शेतीचे नुकसान, आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र राजकीय नेत्यांना त्याची जाणीव नाही. नेतृत्वाच्या स्तरावर उदासीनता आहे. त्यात बदल झाला नाही तर हवामान बदलाचे हे संकेत भविष्य (Future) भीषण स्थितीकडे जाऊ शकते असे आहेत. (Climate change given us a serious notice for future alarm)

पाऊस, आर्द्रता आदी वैज्ञानिक नोंदी जगात अलीकडे म्हणजे साधारण दीडशे वर्षांपासून ठेवल्या जाऊ लागल्या. पण या तापमान नोंदीत किती अचूकता आहे, हे ठामपणे अजून कोणी सांगू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे तापमान मोजण्याची पद्धत. सर्वोच्च तापमान मोजायचं झाल्यास सावलीत, हिरवळीवर तापमान मोजले जाते.

ब्रिटिशकाळापासून चालत आलेली ही पद्धत आहे. या पद्धतीमुळे प्रत्यक्ष शेतात किंवा रस्त्यावर, डोक्यावर किती उष्णता आहे हे नेमकेपणाने कळत नाही, असे शास्त्रज्ञांचा एक गट मानू लागला आहे. जे आकडे दिले जातात, त्यापेक्षा अनुभवलेले तापमान ३ ते ५ अंशांनी जास्त असते, असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

ही बाब पुढच्या काळात सर्वमान्य झाली, तर आपण मानवजातीला माफ करू शकणार नाही. कारण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. हीच परिस्थिती अवकाळी पावसाबाबतची आहे. कधी नव्हे एवढा पाऊस भर मार्चमध्ये अनुभवायला येतोय. शेतीचे प्रचंड नुकसान या पावसामुळे होत आहे. अतिशय वेगाने बदलणारे हे निसर्गचक्र वेगाने समजून घ्यायला हवं. निसर्गाचा असमतोल या सगळ्याच्या मुळाशी आहे, हे गृहीतक मानून त्या संदर्भात तातडीने कार्यवाही सर्व स्तरांवरून व्हायला हवी.

नाशिकसह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये कारच्या माध्यमातून हजारो टन कार्बन उत्सर्जन होत आहे. कार्बन उत्सर्जनासाठी कार सर्वांत प्रमुख कारण आहे. आपण किती वेगाने सार्वजनिक वाहतूकव्यवस्था मजबूत करू शकू, त्यावर पर्यावरणाचं निम्म चक्र अवलंबून आहे.

आपल्याला काँक्रिटचे रस्ते आवडत असले तरी देखील ही सर्वांत भयाण गोष्टींपैकी एक आहे. काँक्रिटमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान रोखायला हवे. मुंबईतील माहीमच्या रस्त्याचं उदाहरण त्यासाठी प्रातिनिधिक ठरतं. १८४५ मध्ये मुंबईची बेटे व उपनगरे जोडणारा ‘लेडी जमशेटजी’ रस्ता, ज्याचा मिठी नदीवरचा पूल हा भाग आहे, तो बांधला गेला.

सुमारे १७५ वर्षांपूर्वी बाधलेला हा ऐतिहासिक रस्ता डांबरी आहे. त्याचा प्रचंड वापर असूनही हा रस्ता उत्कृष्ट स्थितीत आहे. मग ही सिमेंटच्या रस्त्यांची हजारो कोटी खर्चाची टूम कुणाचे खोके भरण्यासाठी आहे? याचा विचार गांभीर्याने व्हायला हवा.

पेट्रोल-डिझेल जाळण्याऐवजी आपण कार विजेवर नेली. आता त्यामुळे औष्णिक वीजनिर्मितीत अधिक कोळसा जाळला जाऊ लागलाय. सध्या पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायूपैकी सुमारे ७५ टक्के उत्सर्जनास मोटार हे एकमेव कारण आहे. मोटारीच्या नलिकेद्वारे एकूण वार्षिक चार हजार कोटी टन उत्सर्जनापैकी ४० टक्के म्हणजे सुमारे १,६०० कोटी टन कार्बन डायऑक्साईड वायूचे उत्सर्जन होते. जर्मनीतील हायडेलबर्ग संशोधन संस्थेच्या अभ्यासाप्रमाणे एका मोटारीच्या निर्मितीस सुमारे दीड लाख लिटर पाणी लागते. त्याला पर्याय म्हणजे सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेवर तातडीने नागरिकांना न्यायला हवे. त्यासाठीची सक्षमता प्रत्यक्षात कधी येईल, हे सांगता येत नाही.

पृथ्वी ही माणूस नावाच्या प्राण्यासाठी आहे. ती व्हेल, हत्ती व पाणघोड्यांसारख्या महाकाय प्राण्यांचेही पालन पोषण करू शकते, त्यांना सांभाळू शकते. प्राणवायू पाणी व अन्न हे पृथ्वीने सृजन केलेल्या सजीवांसाठी आहे. परंतु मानवाने निर्माण केलेल्या मोटार, विमान, जहाजे, टीव्ही, फ्रीज, कॉम्प्युटर इ. निर्जीव यंत्रांसाठी व वीज, सीमेंट, पोलाद, प्लॅस्टिक, फायबर अशा हजारो कृत्रिम उत्पादनांसाठी नाही.

ही उत्पादने पृथ्वीवर अपरिवर्तनीय बदल व अक्षम्य हानी करतात. नेमक्या या गोष्टीकडे लक्ष जाऊ नये म्हणून प्रतिवर्षी उच्चांक घडवणाऱ्या तापमान, पाऊस, अतिवृष्टी, बर्फवृष्टी, वादळे, वणवे, महापूर याबाबत बालिश स्पष्टीकरणे दिली जात आहेत. वेळ तर, भारतात तर ज्या उद्योगपूर्व कृषिप्रधान असण्याच्या काळाचा उल्लेख आपण करतो त्या ऊर्जाविरहित शाश्वत जीवनपद्धतीकडे त्यातील सामाजिक दोष काढून टाकून परत जाण्याची आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT