Nashik Ring Road, Farmers Protest : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित असलेल्या नाशिक रिंगरोड प्रकल्पासंदर्भातील शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंबईकडे निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवलं. यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यावर मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाल्याशिवाय पोलीस स्थानकातून घरी परतणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.
रिंगरोड प्रकल्पामुळे बाधित होणारे शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने बैठकीची मागणी करत आहेत. योग्य अलाइनमेंट, न्याय मोबदला आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण या प्रमुख मागण्यांसाठी शासनाशी चर्चा व्हावी, अशी त्यांची भूमिका आहे. वारंवार निवेदने, पत्रव्यवहार आणि बैठकीच्या मागण्या करूनही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान शुक्रवार (दि. ३) शेतकरी मुंबईकडे रवाना झाले असता मुंबई पोलिसांनी नाशिक पोलिसांना आंदोलनास परवानगी नसल्याचे कळवून आंदोलकांना अडविण्याची कारवाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकारामुळे आंदोलक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप दिसून आला.
याबाबत प्रतिक्रिया देताना छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी सांगितले की, "आम्ही संघर्षासाठी नव्हे तर चर्चेच्या माध्यमातून न्याय मिळवण्यासाठी मुंबईकडे जात होतो. मुख्यमंत्री संवेदनशीलपणे आमचे म्हणणे ऐकतील, या विश्वासाने आम्ही निघालो होतो. मात्र,चर्चेऐवजी हजारो शेतकऱ्यांना अटक करून लोकशाही मार्ग बंद करण्यात आला. हा प्रकार संविधानिक अधिकारांवर घाला घालणारा असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो".
गायकर म्हणाले, "आमचा विकासाला विरोध नाही. रिंग रोडलाही विरोध नाही. मात्र विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी अन्यायकारक मोबदल्यात घेण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही. योग्य अलाइनमेंट, न्याय मोबदला आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचा सन्मान झाला पाहिजे. हा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे."
पोलिसांनीच मध्यस्थी करावी
करण गायकर यांनी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत सांगितले की, आझाद मैदानावर संविधानाने दिलेल्या आंदोलनाच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी आम्ही जात असताना आम्हाला अडविण्यात आले. आता पोलिस प्रशासनानेच मध्यस्थी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तातडीने बैठक आयोजित करावी. जोपर्यंत चर्चा होत नाही आणि न्याय्य तोडगा निघत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही."
छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये शिवा तेलंग नवनाथ शिंदे, डॉ. किरण डोके, सुभाष गायकर आशिष हिरे, वैभव दळवी, नाना पालखेडे, आकाश जाधव, शुभम देशमुख, बॉबी निकम, गोरख जाधव, अलीम सय्यद, शाहरुख मन्सुरी, संगीता सूर्यवंशी, सविता वाघ, सचिन जाधव, तेजस वाघ आधी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्यमंत्री स्तरावर बैठक आयोजित करावी, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि संवादातून प्रश्न सोडवावा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.