Congress OBC meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress OBC meeting : 'पलटू चाचा' सरकार पाडणार, मोदी मोठा निर्णय घेणार; काँग्रेसच्या कॅप्टन यादव यांचा दावा

Pradeep Pendhare

Ahmednagar News : "राजकारणात नितीश कुमार पलटू चाचा म्हणून ओळखले जातात आणि आता त्यांच्या जोडीला चंद्रबाबू नायडू केंद्रात आहेत, या दोघा पलटू चाचांच्या कुबड्या घेऊन मोदी सरकारचे कामकाज चालू आहे. एक-दोन वर्षात हे दोघेही मोदी सरकार पाडतील, असा दावा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंह यादव यांनी केला. मोदी सरकार पडल्यावर इंडिया आघाडी सरकार स्थापन करू शकते. मात्र मोदी तसे होऊ न देता नव्याने निवडणुका देशावर लादतील", असा दावाही कॅप्टन यादव यांनी केला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचा मेळावा अहमदनगर येथे झाला. काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ व पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रातील मोदी (Narendra Modi) सरकार पाडण्याचे कोणतेही प्रयत्न इंडिया आघाडी करीत नाही. मात्र या सरकारच्या नितीश कुमार आणि चंद्रबाबू या दोन कुबड्याच हे सरकार पाडेल, असा दावा करत कॅप्टन यादव यांनी केंद्राच्या यंदाच्या बजेटमध्ये निवडणुका होत असलेल्या महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणाला पैसे न देता केवळ नितीश कुमार आणि चंद्राबाबूला पैसे दिले आहेत. शिवाय मोदी स्वतःला देवता मानतात. अहंकार त्यांच्यात आहे, चारसौ पार नारा, संविधान बदलासाठीच दिला होता. त्यामुळे येत्या दोन वर्षात हे सरकार स्वतःच्याच वजनाने पडेल, असा दावाही कॅप्टन यादव यांनी केला.

सरकारने तो निर्णय घ्यावा

मराठा समाजाने ओबीसीमधून आरक्षण मागितले आहे. यावर स्पष्ट भाष्य करण्यास कॅप्टन अजयसिंह यादव यांनी नकार दिला. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घ्यावा. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याबाबत मध्यम मार्ग काढण्याबाबत सुचवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता याबाबत निर्णय घ्यावा, असे कॅप्टन यादव यांनी म्हटले.

जातीय गणना आवश्यक

मात्र, आरक्षण मर्यादा 50% च्या पुढे देण्यासाठी जातीय जनगणना आवश्यक आहे. जाती गणनाद्वारे प्रत्येकाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थिती समजेल. गरीब व श्रीमंत कोण हेही स्पष्ट होईल. त्यामुळे ज्याची जेवढी लोकसंख्या, तेवढे अधिकार त्यांना मिळतील. जाती गणना झाली नाही तर 2026 मध्ये डीलिमिटेशन कसे करणार, असा सवाल करून ते म्हणाले, आम्ही सत्तेवर आल्यास जातनिहाय जनगणना करणार, मागास वर्गातील महिलांना आरक्षण देणार, पंचायत राज व्यवस्थेत आरक्षण देणार, क्रिमिलेयरची मर्यादा 12 लाख करणार, उच्च शिक्षणातही आरक्षण देणार, अशी ग्वाही कॅप्टन अजयसिंह यादव यांनी दिली.

बूथ स्तरावर यंत्रणा असलेल्यांना उमेदवारी

ओबीसी विभागाने विधानसभेच्या 27 जागा प्रदेश काँग्रेसकडे मागितल्या आहेत व यात नगरची जागा मंगल भुजबळ यांना द्यावी, असे सुचवल्याचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी यावेळी सांगितले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष यादव यांनी, ज्या उमेदवाराचे प्रत्येक बूथवर किमान दहा सदस्य असतील आणि बूथ स्तरावर संपर्क यंत्रणा आहे, अशांना पसंती दिली जाणार आहे. काँग्रेसचा निधी सिझ (जप्त) झाल्याने ज्या उमेदवाराकडे निधी आहे, त्यालाही पसंती असेल. यासंदर्भात निरीक्षक तिरूमला (केरळ) प्रत्येक मतदारसंघात दौरे करणार आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

वाघ आणि काळेंविरोधात तक्रार करणार

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या ओबीसी विभागाची नगरमध्ये बैठक असताना व राष्ट्रीय अध्यक्ष आले असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ व शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे या बैठकीकडे फिरकले नाही, याबाबत विचारले असता, यासंदर्भात ओबीसींचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार करतील, असे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंह यादव यांनी स्पष्ट केले. मात्र, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ काही काळ बैठकीला आले होते व नंतर निघून गेले, असे ओबीसी राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT