Eknath Shinde & Rahul Dive Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress Politics: भाजपने भ्रष्टाचारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडले नाही, याची खंत!

Sampat Devgire

Congress Vs BJP News: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. हे भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या दर्जाहीन कामाचे प्रतीक आहे. यावर काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत.

भारतीय जनता पक्ष प्रत्येक कामात राजकारण आणि भ्रष्टाचार करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षभरात लोकार्पण केलेल्या अनेक प्रकल्पांची दुरावस्था झाली आहे. पूल कोसळले, महामार्गावर खड्डे पडले, एव्हढेच काय अनेक विकास कामे निकृष्ट ठरल्याने नागरिकांना त्रासदायक ठरली आहे.

त्याचे प्रतीक भाजप आणि राज्यातील महायुती सरकारने महाराष्ट्रातही घडवले. यासंदर्भात सबंध देशाचे आणि राज्याचे विशेषता मराठी माणसाचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही भाजपने अपवाद केला नाही. या कामाबाबत अनेक संशय निर्माण झालेले आहेत.

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा पुतळा ज्या पद्धतीने कोसळला आणि त्याचे तुकडे झाले. ते पाहता तो ब्रांचचा पुतळा होता का की, वेगळ्याच काही होता. असा संशय येतो. यामध्ये नक्कीच मोठा घोटाळा आहे. असा संशय सबंध महाराष्ट्राला निर्माण झाला आहे.

या प्रकरणांची गंभीर चौकशी झाली पाहिजे. या चौकशीतील दोषींवर आणि त्यांना आदेश देणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. या कारवाईने देखील महाराष्ट्रातील जनतेच्या दुखावलेल्या भावना कमी होणार नाहीत. त्यामुळे भाजपने ताबडतोब सबंध राज्याची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल दिवे आणि शिष्टमंडळाने केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व करण्याचा कटाटोप करू नये. यात ते आणखीन गाळात रुतण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी ताशी ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याने पुतळा कोसळला, असा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दावा हास्यास्पद आहे.

तीन दिवसांपूर्वी नाशिक मध्ये हवामान खात्याने पन्नास किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील, असे कळविले होते. नाशिकमध्ये वादळ आणि पाऊस दोन्ही आले. मात्र साध्या घरावरचं कौलही उडालेले नाही. कुठे नुकसानही झालेले नाही. मुख्यमंत्री आपल्या अधिकाऱ्यांकडून योग्य माहिती न घेताच भाजप आणि राज्य सरकारला वाचविण्यासाठी अशी विधाने करतात. त्यांनी लोक भावनेचा आदर करावा. अन्यथा राज्यातील मराठी माणूस त्यांना योग्य शब्दात योग्य उत्तर देईल.

रायगडावर राज्याचे पहिले मुख्यमंत्री (कै) यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरी उभारण्यात आली. देशाचे पहिले पंतप्रधान (कै) पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याचे लोकार्पण केले. गेल्या साठ वर्षात या मेघाडंबरीला आणि पुतळ्याला काहीही झाले नाही. उठ सूट पंडित नेहरू यांच्यावर टीका करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय पंडित नेहरू यांच्या या कामाचा आदर्श घ्यावा.

महाराष्ट्रात हे प्रकरण भाजपच्या राजवटीत घडले. त्यामुळे या पक्षाने सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यांनी पायउतार व्हावे असा इशारा देण्यात आला. यावेळी नाशिक येथील शिवस्मारकासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रदेश सचिव दिवे, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष स्वप्निल पाटील, प्रा. भालचंद्र पाटील,ओबीसी सेलचे विजय राऊत, अनुसूचित जातीचे सचिव सुरेश मारू, स्वाती जाधव, वसंत ठाकूर, विजय पाटील यांसह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT