Congress News: अतीउत्साह आणि आपसातील गटबाजी यामुळे काँग्रेस पक्ष गेली काही वर्ष अस्तित्वासाठी झगडत होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या राजकीय धडसोडपणामुळे या पक्षाला अतिशय मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले.
काँग्रेस पक्ष नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घसरणीला लागला आहे. या पक्षाचे बहुतांश नेते इतर पक्षात निघून गेले आहेत. जे सध्या या पक्षात आहेत, त्यांनी चक्क भाजपचा प्रचार केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात आढळला आहे. त्यामुळे राष्ट्रीय नेतृत्व वैचारिक लढा देत असताना स्थानिक नेते मात्र विचारधारेला तिलांजली देत असल्याचे आढळून आले.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाशिकमध्ये पक्षाच्या विस्तारासाठी काम करण्याऐवजी फाजील आत्मविश्वासाने उमेदवार दिले. त्याचा अतिशय मोठा परिणाम या पक्षाच्या अस्तित्वावरच आता निर्माण झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. आता या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची स्थिती आत्मपरिक्षणाच्याही पुढे गेली आहे.
काँग्रेस पक्षाला सगळ्यात मोठा धक्का इगतपुरी मतदार संघात बसला आहे. या मतदारसंघात हिरामण खोसकर हे विद्यमान आमदार काँग्रेसचे होते. वरिष्ठ आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांनी आपसातील कुरघोडीच्या राजकारणामुळे निवडणुकीआधी आमदार खोसकर यांना मानसिक दृष्ट्या त्रास देण्याचा प्रयत्न केला. परिणामी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार खोसकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात निघून गेले. ते भरभक्कम आघाडी घेऊन निवडून देखील आले.
या मतदारसंघात काँग्रेस पक्षाने लकी जाधव या अत्यंत नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली. माजी आमदार निर्मला गावित या इच्छुक असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी काँग्रेस पक्षाला अवघे तीस हजार मते मिळून येथून खोसकर हे ८६ हजार पाचशे आठ मताधिक्याने विजयी झाले. चुकीचे निर्णय घेतल्याने काँग्रेसचे बहुतांश कार्यकर्ते आणि पदाधिकारी अपक्ष उमेदवार निर्मला गावित यांच्यासोबत निघून गेले आहेत.
चांदवड मतदार संघात पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, माजी आमदार शिरीष कोतवाल हे गेले चार निवडणुका भाजपच्या विरोधात पराभूत होत आहेत. मात्र प्रत्येक वेळी तेच अट्टाहासाने उमेदवारी घेतात. या ठिकाणी पक्षाचे बाजार समितीचे अध्यक्ष संजय जाधव यांनी उमेदवारी मागितली होती. अन्य प्रबळ उमेदवार देखील काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र पुन्हा एकदा माजी आमदार कोतवाल यांना उमेदवारी देण्यात आली. कोतवाल यांचा अतिशय मानहानीकारक पराभव झाला. त्यांना अवघे २३ हजार मते मिळून ते चौथ्या स्थानावर गेले. येथून भाजपचे आमदार राहुल आहेर हे ४८ हजार मतांनी विजयी झाले. आता काँग्रेस पक्षापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे
बहुचर्चित मालेगाव विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला एक लाख ९८ हजार मते मिळाली होती. मात्र विधानसभेला पक्षाने एजाज बेग यांना उमेदवारी दिली. त्यांना अवघे सात हजार ५२७ अशी दुर्लक्षित मते मिळाली आहेत. त्यामुळे मालेगाव या अल्पसंख्यांक समाजाचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातही काँग्रेस आता नामशेष झाली, असे म्हणता येऊ शकते.
या सगळ्यांचा परिणाम म्हणजे कार्यकर्त्यांमधील आत्मविश्वास संपुष्टात आला आहे. जिल्ह्याचे पदाधिकारी देखील संभ्रमावस्थेत आहेत. उमेदवारी कोणाला द्यावी हा घोळ आणि चुका राज्यस्तरीय नेत्यांनी केला. त्याचा फटका नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाला बसला. आता अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत या पक्षाचे काय होणार? या चिंतेने सर्व पदाधिकारी ग्रस्त आहेत.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.