
Sunil Bagul News: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. यामध्ये एक मोठी अदृश्य शक्ती पडद्यामागून काम करत होती. या शक्तीच्या प्रभावामुळे विरोधी पक्ष सैरभैर झाला असे चित्र आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची चिंतन बैठक मंगळवारी नाशिकच्या कार्यालयात झाली. यावेळी शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि माजी आमदार योगेश घोलप या उमेदवारांच्या मतदारसंघातील प्रचाराच्या आढाव्यासाठी बैठक झाली. यावेळी हे तिन्ही उमेदवार मात्र मुंबईत पक्षाच्या बैठकीला गेले होते. यावेळी या तिन्ही या उमेदवारांच्या समर्थकांनी विविध तक्रारी केल्या.
यावेळी शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल, माजी मंत्री बबन घोलप, माजी महापौर विनायक पांडे, महानगर प्रमुख विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी यांसह विविध नेते उपस्थित होते. या नेत्यांनी आपले अनुभव कथन केले.
यावेळी शिवसेनेच्या तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत आलेले आपले अनुभव मांडले. याबाबत अनेक कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. त्यांनी सत्ताधारी पक्षाकडून झालेल्या सत्तेच्या दुरुपयोगाच्या विविध अनुभव त्यांना आले होते.
या संदर्भात आपण येथे सुनील बागुल यांनी सत्ताधारी महायुती कशी जिंकली, त्याची काही कारणे कथन केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात निवडणुकीदरम्यान राज्य बाहेरून सुमारे दीड लाख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक दाखल झाले होते. या स्वयंसेवकांनी निवडणुकीवर आणि समाजावर प्रभाव टाकतील अशा किंगमेकर लोकांच्या गोपनीय भेटी घेतल्या.
त्यांनी भाजपची यंत्रणा आणि काम राज्याच्या हितासाठी कसे आहे, यावर भर दिला. विशेष म्हणजे प्रत्येक मतदारसंघात असे दीडशे लोक काम करत होते. याशिवाय गुजरात मधून अनेक आमदार आणि माजी आमदार राज्यात काम करीत होते. प्रत्येक मतदारसंघात एक आमदार महत्त्वाच्या लोकांना भेटून जे महायुतीचे कार्यकर्ते निष्क्रिय असतील, त्यांना सक्रिय करण्यावर भर देत होता.
सक्रीय नसलेल्या लोकांची माहिती तातडीने पक्षाच्या वरिष्ठ यंत्रणेला कळविली जात होती. ही यंत्रणा संबंधित लोकांची नाराजी दूर करण्यासाठी "विशेष"मदत त्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवीत होती. याशिवाय प्रत्येक मतदारसंघातील शासनाच्या योजनेचा लाभ घेतलेल्या सरासरी एक लाख लोकांची नावे दूरध्वनी क्रमांकांसह शासनाच्या यंत्रणेकडून भाजपच्या लोकांनी प्रत्येक मतदारसंघात उपलब्ध करून दिली होती.
सरकारी योजनेचा लाभ घेतलेल्या या सर्व नागरिकांना भाजपमुळे तुम्हाला हे सर्व लाभ झाले, असे सांगत त्यांना मतदानाचे आवाहन केले जात होते. प्रत्यक्ष प्रचार सुरू असतानाच काही यंत्रणा हिंदुत्व धोक्यात आले आहे. समाजामध्ये असुरक्षितता कशी निर्माण होईल, यासाठी समाज माध्यमे व फलकांचा वापर करीत असल्याचे आढळले.
दिसणाऱ्या प्रचारापेक्षा न दिसणारा प्रचार अतिशय व्यापक होता. त्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांच्या प्रचारकांनी काउंटर करण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. त्याचा लाभ भाजपच्या यंत्रणेने घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी एक मोठी अदृश्य यंत्रणा महाराष्ट्रभर दिवस-रात्र काम करत होती. त्याचा परिणाम भाजपला आणि त्यांच्या सहकारी पक्षांना निवडणुकीत झाला, हे स्पष्ट झाले आहे.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.