Kunal Patil, Congress Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kunal Patil Politics: भाजपने शेतकऱ्यांवर केला घोर अन्याय, जनता परतफेड करणारच!

Sampat Devgire

BJP Vs Congress News: महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य आहे. मात्र केंद्रतील भाजपच्या सरकारने अर्थसंकल्पात शेतकरी आणि महाराष्ट्र दोघांवरही अन्याय केला. राज्याची प्रगती रोखण्याचा डाव भाजपने आखला आहे. केंद्रातील भाजपचे सरकार सातत्याने महाराष्ट्रावर अन्याय करीत आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. यामध्ये राजकीय सोय म्हणून अनेक राज्यांवर निधी आणि योजनांचा वर्षाव केला. मात्र देशाला सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्रावर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला.

महाराष्ट्राची प्रगती रोखण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा सूड अशा प्रकारे उगवू नये. अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये त्याचा जाब विचारला जाईल, असा इशारा आक्रमक झालेले काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील आणि जिल्हा अध्यक्ष शाम सनेर यांनी दिला.

काँग्रेसचे आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाले. त्यात मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी झाले होते. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्रावर अन्याय करीत आहेत. शेतकऱ्यांसाठी कोणतीही योजना त्यांनी आणलेली नाही. शेतकरी सध्या संकटात सापडला आहे.

अनेक व्यवसाय आणि व्यवस्था शेतीवर अवलंबून आहेत. मात्र भाजपला त्याचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. पिकविम्यासह अनेक प्रश्न तीव्र बनले आहेत. त्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला, तरीही त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले, अशी टीका आमदार पाटील यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस नेते श्याम सनेर नाराज होते. मात्र नंतर ते नाराजी विसरून पक्षाच्या कामाला लागले होते. निवडणुकीनंतर त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणत्याही योजना, विशेष निधी नाही. त्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी केंद्रातील सरकार आणि भाजपचा निषेध करण्यात आला.

केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीही तरतूद नाही. शेती आणि शेतकरी यांच्या अनेक समस्या आहेत. मात्र केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे, असे यावेळी निवेदन देताना पदाधिकाऱ्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष डॉ. अनिल भामरे, माजी आमदार डी. एस. अहिरे बाजार समितीचे सभापती भगवान गडदे, इंटकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद शिसोदे, पंढरीनाथ पाटील, सोमनाथ पाटील, बी. डी. पाटील, बापू खैरनार, लहू पाटील या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलन सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT