Igatpuri Congress news: राज्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा दणका बसला. अति आत्मविश्वासामुळे पक्षाच्या नेत्यांचे विमान जमिनीवर उतरले. मात्र अद्यापही हे नेते पराभवातून सावरलेले दिसत नाहीत.
इगतपुरी मतदारसंघात मात्र वेगळेच चित्र पहायला माळाले. काँग्रेस पक्षाने दिलेला उमेदवार कुठे आहे?, तो सापडत नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाने दिलेला उमेदवार चुकीचा होता. त्याचा पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाशी काहीही संबंध नाही, असे ठाम मत पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे होते.
निवडणुकीत तालुका अध्यक्ष वगळता कोणताही पदाधिकारी लकी जाधव या काँग्रेसच्या उमेदवाराबरोबर दिसला नाही. पक्षाचे वरीष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्षांनी त्यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जाते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या या उमेदवाराला मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाने स्थानिक उमेदवार श्रीमती बेंडकुळी अथवा माजी आमदार निर्मला गावित यांचा विचार न केल्याने पदाधिकारी संतप्त झाले होते
या मतदारसंघात माजी आमदार निर्मला गावित यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. त्यांनी आपण महाविकास आघाडीचेच उमेदवार आहोत असा दावा केला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीमती गावित यांचा प्रचार केला. अपक्ष उमेदवार असूनही गावित यांना लक्षणीय अशी २३ हजार मते मिळाली.
इगतपुरी मतदार संघातून विद्यमान आमदार हिरामण खोसकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची उमेदवारी केली होती. यामुळे या मतदारसंघात काँग्रेसला मोठा फटका बसला तर महायुतीचा विजय झाला.
निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे उमेदवार कुठे आहेत याचा शोध सुरू आहे. मात्र राजीनामा दिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाची बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पक्षाचे सचिव भास्कर गुंजाळ यांनी दुरावलेल्या या कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे राज्यभर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाही. त्याला इगतपुरी हा मतदार संघ अपवाद ठरला आहे.
या निवडणुकीत प्रबळ दावेदार आणि संगमनेर मतदार संघात नऊ वेळा निवडून आलेले बाळासाहेब थोरात यांनाही महायुतीच्या प्रचाराचा फटका बसला. त्यांचा धक्कादायक पराभव झाला. श्री थोरात यांनीच इगतपुरी मतदार संघातील उमेदवार निश्चित केला होता.
माजी मंत्री श्री थोरात यांनी आपल्या मतदारसंघात पुन्हा एकदा कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदारसंघ बांधणीचा निर्णय घेतला आहे. असाच निर्णय ते इगतपुरीसाठी घेणार का? हा चर्चेचा विषय आहे. जिल्ह्यातील अन्य सर्वच पदाधिकारी पराभवाच्या धक्क्यात आहे. बहुतांश नेतेही गोंधळलेले आहेत
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवार लकी जाधव यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात प्रदेशाध्यक्षांकडे कारवाईसाठी पत्र लिहिले आहे. त्याची फारशी दखल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेली नाही असे कळते. स्थानिक पदाधिकारी ही प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या संपर्कात आहेत. निवडणुकीच्या पराभवामुळे काँग्रेस पक्ष राजकीय दृष्ट्या नाउमेद झाला असला तरी इगतपुरी मतदार संघात मात्र कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने पक्षाची बांधणी करण्याचा निर्णय घेतल्याने हा मतदारसंघ चर्चेचा विषय आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.