Bharti Pawar, Dilip Walse Patil, Hemant Godse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik District Bank Politics : मंत्री भारती पवार, खासदार गोडसे म्हणतात बँक वाचवा; मग वाचवणार तरी कोण?

संपत देवगिरे : सरकारनामा

Nashik News : नाशिक जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक सध्या अडचणीत आहे. या बँकेला अर्थसाह्य करा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, खासदार हेमंत गोडसे आणि सत्ताधारी नेत्यांनी केली. सत्ताधारीच अशी मागणी करतात, मग बँकेला वाचवणार कोण? असा गंभीर पेच निर्माण झाला आहे. (Nashik District Bank Politics)

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशनचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी नाशिक येथे झाले. यानिमित्ताने सहकारी बँकांच्या समस्यांचा पाढा वाचण्यात आला. यावेळी सगळ्यात गंभीर प्रश्न नाशिकच्या जिल्हा बँकेचा होता. आर्थिक अडचणींमुळे व नियमबाह्य कारभारामुळे रिझर्व्ह बँक या बँकेचा परवाना केव्हाही रद्द करू शकते, अशी स्थिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असे असतानाही राज्य सरकारकडून बँकेला मदतीसाठी कोणीही पुढाकार घेतलेला नाही. सरकारनेही दुर्लक्ष केलेले आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील 15 पैकी 13 आमदार सत्तेत आहेत. यातील बहुतांश आमदार बँकेत कारभारी असताना बँक संकटात गेली. तरीही कोणीच शेतकऱ्यांची ही बँक वाचविण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही.

नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह जिल्हा बँक कर्मचारी संघटनेनेदेखील बँकेला वाचवा आणि तिला अर्थसाह्य करा, अशी मागणी केली. त्यावर राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीदेखील नक्की मदत करू, असे आश्वासन दिले.

या सर्व घडामोडींत बँकेची आजची स्थिती गेली अनेक वर्षे दुर्लक्ष केल्यामुळे निर्माण झालेली आहे. बँकेला वाचवा म्हणणारेदेखील सत्ताधारी आणि नक्की वाचवू, असे सांगणारेदेखील सत्ताधारीच आहेत. मग नेमके बँकेला वाचवणार तरी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे उत्तर काहीसे राजकीय मात्र बरेचसे अवघड दिसते आहे.

नाशिकच्या जिल्हा बँकेवर सध्या प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. या बँकेची थकबाकी 2100 कोटी असून या वसुलीत मोठ्या प्रमाणावर राजकीय अडथळे येत आहेत. मोठ्या थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळत नाही. यात बहुतांशी राजकीय नेतेच आहेत. त्यामुळे बँकेचा एनपीए 71.45 टक्के, तर तोटा 900 कोटी रुपये झाला आहे.

बँकेला तातडीने 718 कोटी रुपयांची मदत करावी अथवा बँकेला पाचशे कोटी रुपये सवलतीच्या दरात कर्ज द्यावे, ही प्रमुख मागणी आहे. या मागणीप्रमाणे काही प्रतिसाद मिळाला तरच या बँकेची स्थिती सुधारू शकते. अन्यथा रिझर्व्ह बँकेकडून केव्हाही बँकेचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली ही बँक संकटात असताना, सत्ताधारी मात्र निर्धास्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बँकेला वाचवणार तरी कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT