Girish Mahajan & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Guardian Minister : पालकमंत्री बदलाचा भुसेंनी घेतला धसका; महाजनांनंतर पुन्हा घेतली आढावा बैठक, उद्‌घाटनही उरकले...

Dispute in MahaYuti : नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्याऐवजी गिरीश महाजन यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nashik News : राज्यात युती सरकारसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटही सत्तेत सहभागी झाल्याने शिवसेना अस्वस्थ झाल्याचे दिसून येते. मात्र, ही नाराजी उघड न दाखवता आहे त्या परिस्थितीत दिवस काढण्याचे काम सध्या नेत्यांकडून सुरू आहेत. मंत्रिपदाच्या शर्यतीतील अनेक इच्छुक सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत असताना पालकमंत्री बदलाचे वारे जोमाने वाहू लागले आहे. नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्याऐवजी गिरीश महाजन यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळेच की काय चार दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये आढावा बैठक घेत शेतकऱ्यांना आश्वासन दिल्यामुळे विचलित झालेले विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी तातडीने टंचाई आढावा बैठक घेतली. (Dada Bhuse held an urgent meeting fearing the change of Guardian Minister)

जिल्हाधिकारी कार्यालयात चार तास झालेल्या या बैठकीनंतर दादा भुसेंनी पत्रकार परिषदेत नाशिक जिल्ह्यात कोरडा दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचे मान्य केले. त्यासाठी त्रिसूत्री अमलात आणण्याच्या सूचनाही केल्या. तसेच, कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी काय तोडगा काढता येईल, यादृष्टीनेही त्यांनी उपाययोजना सुचवल्या. मात्र, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी चार दिवसांपूर्वी नेमकं काय आश्वासन दिलं याविषयी त्यांनी ‘माहिती घेऊन सांगतो,’ असे सांगून जादा बोलणे टाळले. भविष्यात पालकमंत्रिपदाबाबत बदल होऊ शकतो, याची चाहूल लागल्यानेच दादा भुसे यांनी ही तातडीची बैठक बोलावल्याचे सांगितले जाते.

आयुक्तांसोबतच्या बैठकीचे गुपित काय?

या बैठकीनंतर त्यांनी रात्री उशिरा पोलीस आयुक्त कार्यालयात निवडक उपायुक्त आणि पोलिस आयुक्तांची बैठक घेतली. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे काय उपाययोजना करता येतील, यासाठी ही बैठक घेण्यात आली. पण, अशी बैठकच होणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं आणि अचानक पोलिस आयुक्तांची बैठक घेण्यामागे नेमकं गुपित काय दडलंय असाही प्रश्न उपस्थित होतो.

पंधरा ऑगस्टपासूनच बदलाची चाहूल

स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदनाची प्रमुख जबाबदारी ही पालकमंत्र्यांवर असते. परंतु, महायुतीच्या सरकारने वेगवेगळ्या ठिकाणी मंत्र्यांना पाठवून पालकमंत्री बदलाच्या हालचालींना सुरुवात केली. मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. विस्तारित मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, याविषयी अजूनही स्पष्टता नाही. त्यातच नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन हे सातत्याने प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. त्यांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजवंदन झाले, तेव्हापासूनच भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण दिसून येते. या घडामोडींना पंधरा दिवस झाले तरी अजूनही हालचाली दिसत नसल्याने ग्रामविकास मंत्र्यांनी तातडीने ही बैठक घेतल्याचं बोललं जाते.

दादा भुसेंनी एक दिवस अगोदरच उरकले उद्‌घाटन

ध्वजवंदनाच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे १५ ऑगस्टला नाशिकमध्ये येणार हे स्पष्ट झाल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी १४ ऑगस्टलाच बहुतेक शासकीय कार्यक्रमांचे उद्‌घाटन करून घेतले होते. यात कृषी आणि जिल्हा परिषदेचा रानभाज्या महोत्सव, त्यासोबतच इतर खासगी कार्यक्रमांनाही भुसे यांनी हजेरी लावली होती. ग्रामविकास मंत्री फक्त ध्वजवंदन सोहळ्यात सहभागी झाले आणि परतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT