Devendra Fadnavis News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis Announcement: उपमुख्यमंत्री फडणवीसांची पश्चिमवाहिन्या नद्यांबाबतची घोषणा खरी की निवडणुकीचे नॅरेटीव्ह?

Sampat Devgire

Devendra Fadnavis and Vidhansabha Election News: लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची चाहूल लागली आहे. राज्य शासन आणि राजकीय पक्षांकडून घोषणांचा पडणारा पाऊस त्याचे चिन्ह आहे. मात्र या घोषणा वास्तव की निवडणुकीसाठीचे नॅरेटीव्ह अशी चर्चा सुरू झाली आहे.

सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या योजनेची घोषणा केली. त्यामुळे हे पाणी गिरणा खोऱ्यात वळवले जाईल. त्यातून जळगाव जिल्ह्याला मोठा लाभ अपेक्षित आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी ही घोषणा केली असली तरीही ती प्रत्यक्षात येईल का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्याला विविध कारणे देखील दिली जात आहेत. फडणवीस यांनी 2022मध्ये देखील अशीच घोषणा केली होती. प्रत्यक्षात ती घोषणाच राहिली.

सध्या केलेली घोषणा दोन महिन्यांवर आलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचे दिसते . या घोषणेचा परिणाम म्हणजे जळगाव जिल्ह्यातील सिंचन आणि उद्योगाच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे जळगाव मध्ये त्याचे निश्चितच स्वागत होणार त्याचा लाभकरी जळगावसह मराठावाड्याचे नागरिक असतील.

या योजनेमुळे पाण्याचा प्रश्न वेगळ्या अंगाने सोडविला जाणार आहे. याबाबत सातत्याने विविध पक्षांनी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे जळगाव आणि मराठवाड्याच्या मतदारांत भाजपच्या(BJP) नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारला अनुकूल वातावरण होऊ शकते.

या संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत घोषणा केली. या योजनेला हिरवा कंदील दाखवतानाच या कामासाठी 07 हजार 200 कोटींची तरतूद करावी लागणार आहे. त्याबाबत येत्या आठवड्याभरात ठोस निर्णय करावा लागेल. हा निर्णय होतो की हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि उत्सुकतेचा विषय आहे.

यामध्ये मुख्य कारण असे की, गुजरातला जाणारे हे पाणी महाराष्ट्राकडे वळवायचे आहे. गुजरातचा आणि राज्यातील महायुती सरकारचे संबंध कसे आहेत हे सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत हा महत्त्वाचा प्रश्न खरोखरच मार्गी लागणार की आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने तयार केलेले राजकीय नॅरेटीव्ह असणार? याची चर्चा होणे स्वाभाविक आहे.

या संदर्भात वीस ते पंचवीस वर्षांपासून मालेगाव भागातील नागरिक आणि सर्व पक्षाचे नेते पाठपुरावा करीत आहेत. मालेगावच्या वांजूळ पाणी संघर्ष समितीचे नेते निखिल पवार यांनी याबाबत शासन कार्यवाही करेल याविषयी शंका व्यक्त केली आहे.

काय आहे योजना? -

नाशिक जिल्ह्यातून वाहणाऱ्या नार-पार, दमणगंगा, अंबिका आदी सात पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी वापी आणि बलसाड मार्गे गुजरातकडे जाते. तीस वर्षांपूर्वी हे पाणी पूर्वेकडे वळवावे अशी योजना करण्यात आली. तसे केल्यास हे सर्व पाणी गिरणा खोऱ्यात येईल. त्याचा लाभ दुष्काळी नाशिक, मालेगाव, जळगाव आणि मराठवाड्याला होईल. सिंचन व उद्योगांसाठी पाणी उपलब्ध होईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT