Pratap Dhakne phone speech Dhananjay Munde : अहिल्यानगरच्या पाथर्डी-शेवगाव इथं वंजारी समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं, यासाठी युवकांचं उपोषण सुरू होतं. या उपोषणाला धनंजय मुंडे यांनी मार्गदर्शन करावं, यासाठी काही युवकांचा आग्रह होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी उपोषणस्थळावरून माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना फोन लावला. आमदार मुंडे यांनी फोनवरून आंदोलनकर्त्यांनी संवाद साधताना, मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता एका वाक्यात इशारा देणारी टीका केली. मुंडे यांनी, 'आमचे दोन टक्के काढून घेणारे म्हणणाऱ्यांना टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही,' असा सूचक इशारा दिला.
वंजारी समाजाला 'एसटी'मधून आरक्षण मिळावे, याकरिता पाथर्डी-शेवगावमधील वंजारी समाजाचे युवक काही दिवसांपासून उपोषण करत आहेत. या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी भेट देत चर्चा केली. तत्पूर्वी (BJP) भाजप अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी 15दिवसांत बैठक लागून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं.
मंत्री विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर देखील युवकांचं आंदोलन सुरू होते. उपोषण स्थळावरील अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी थेट माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मोबाईलवरून संपर्क साधला. युवकांच्या आंदोलनाची माहिती दिली. तसंच पालकमंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाची कल्पना दिली. यानंतर आंदोलकांना तु्म्ही समजवा, असे सांगून मोबाईल माईकसमोर धरला. यावेळी आमदार मुंडे यांनी आंदोलकांशी मोबाईलवरच संपर्क साधला.
माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे म्हणाले, "हैदराबाद गॅझेट निघाले नसते, तर आपण म्हणजेच वंजारी समाज, पाथर्डीमध्येच नाही, बऱ्याच ठिकाणी, इतर राज्यांमध्ये, आपण एसटीमध्ये आहोत हेच कळालं नसतं. आम्हाला अगोदरच माहित होतं की आपण एसटीमध्ये आहोत. कारण तेलंगणाच्या बॉर्डरच्या जवळ परळी येते. लोकनेते गोपीनाथ मुंडे असल्यापासून सर्वांना माहिती आहे की, अनेक पाहुणे तिकडे एसटीमध्ये आहेत. आणि आपण इकडं व्हीजे-एनटी मध्ये आहोत."
'आता हैदराबादच्या गॅझेटनुसार चर्चा निघाली आहे. हैदराबादच्या गॅझेटनुसार इतर कुणाला फायदा मिळत असेल, तर त्या हैदराबादच्या गॅझेटनुसार आम्हाला एसटीचा फायदा मिळाला पाहिजे. गॅझेटमधील एका-एका शब्दाचा फायदा इतर कुणाला होत असेल, तर तो देखील आम्हाला झाला पाहिजे. कारण, आपलं दोन टक्क्यांमध्ये बरं चाललं होतं,' असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी वंजारी समाजाचे दोन टक्के आरक्षण काढून घेण्याची मागणी केली होती. या भाष्यावर धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, 'आता हे दोन टक्के सुद्धा काढा, असे काही जण बोलायला लागले आहेत. जे बोलायला लागले आहेत ना, दोन टक्के सुद्धा वंजाऱ्यांचं आरक्षण काढा म्हणून, अरे भावांनो, तुम्हाला टक्क्यांमध्ये सद्धा ठेवणार नाही,' असा खणखणीत इशारा धनंजय मुंडेंनी दिला.
धनंजय मुंडे आंदोलनकर्त्यांना विनंती करताना, हे सरकार आपल्यासोबत आहे, सरकार आपलं नुकसान करणार नाही, सरकारवर विश्वास ठेवा, असे आवाहन केले. तसंच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पाथर्डीत येऊन सांगितलं आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन देऊ. त्यांचा आणि सरकारचा मान ठेवून आपलं उपोषण स्थगित करावं, अशीही विनंती आंदोलनकर्त्यांना धनंजय मुंडेंनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.