Dhangar Reservation Protest  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhangar Reservation : विखे पिता-पुत्रांविरोधात चौंडीत घोषणाबाजी; आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने धनगर समाज नाराज

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Chaundi News: धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेचे चौंडीत गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आंदोलन मंगळवारी मागे घेण्यात आले. मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई यशस्वी ठरली. मात्र, 21 दिवसांपासून सुरू असलेल्या धनगर समाजाच्या या आंदोलनाकडे नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांनी पाठ फिरवल्याने विखे पिता-पुत्रांविरोधात निषेधाच्या घोषणा देत धनगर समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

धनगर समाजाचे शिष्टमंडळ आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात धनगर आरक्षणासंदर्भात जवळपास दोन तास चर्चा झाली. या वेळी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत कार्यवाही आदेश, गरज पडल्यास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करणे, येत्या 50 दिवसांत धनगर आरक्षणाबाबत उचित निर्णयाची कार्यवाही करण्याचे आश्वासन चौंडीत उपोषणाला बसलेले यशवंत सेनेचे कार्यकर्ते आणि शिष्टमंडळाला राज्य सरकारच्या वतीने गिरीश महाजनांनी आज दिले.

याच दरम्यान चौंडीत राज्यभरातून जमलेल्या धनगर बांधवांनी आरक्षणाच्या मुद्द्याबाबत निर्णय होण्यास लागणारा विलंब आणि 21 दिवस उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट न घेणारे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली.

विखे पिता-पुत्राचे करायचे काय..., आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्र्यांचा निषेध असो..., राज्य सरकारचे करायचे काय..., अशा घोषणांनी धनगर बांधवांनी परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी तसेच यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांची सरकारशी चर्चा सुरू आहे, मंत्री महोदय आपल्यासाठी चौंडीत आले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिष्ठमंडळाशी फोनवर चर्चा करत आहेत, त्यामुळे शांतता राखा, असे आवाहन करण्यात येत होते. पण जवळपास दोन तास बोलणी आणि त्यात सरकार आरक्षणाबाबत काय निर्णय घेणार, याची उत्सुकता ताणल्याने नागरिकांनी सरकार आणि विशेष करून विखे पिता-पुत्रांच्या विरोधात रोष व्यक्त केला.

दरम्यान, या वेळी गिरीश महाजन यांच्यासह आमदार राम शिंदे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी मंत्री अण्णा डांगे आदी नेते उपस्थित होते. आता सरकारने 50 दिवसांची मुदत यशवंत सेनेकडून मागून घेतली असून, या मुदतीत आरक्षणाबाबत कार्यवाही पूर्ण करू, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे 21 दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण-आंदोलन उपोषणकर्ते आण्णासाहेब रूपनवर आणि सुरेश बंडगर यांनी लिंबू सरबत घेऊन सोडले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT