Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut : संजय राऊत 500 कोटींचा घोटाळा विसरले? काय आहे कारण?

Sampat Devgire

Nashik News, 7 July : ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर गंभीर आरोप केला होता. नाशिक महापालिकेत 500 कोटींचा घोटाळा झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर पुढे काय झाले याची सध्या चर्चा सुरु आहे.

राऊत यांनी जो आरोप केला, तो भाजप नेते गणेश गीते हे सत्तेत असताना झालेल्या भूसंपादनाबाबतचा होता. तेव्हा राज्यात भाजप, शिवसेना युतीचे सरकार होते. या आरोपानंतर खळबळ उडाली होती. राऊतांच्या आरोपाचा रोख देखील स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष गणेश गीते यांच्यावर होता. हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

कारण लोकसभा निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे होते. त्यांच्या विरोधात वातावरण निर्मितीसाठी राऊत यांनी हा आरोप करून राजकारणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला होता. भाजप (BJP) नेते गणेश गीते यांच्या बाबत त्यांच्या विरोधकांनी भूसंपादनाचा घोटाळा झाल्याचा आरोप यापूर्वीही वारंवार केलेला आहे. आता खासदार राऊत यांनी त्याची पुनरावृत्ती केली. त्यामुळे त्याला गांभीर्य आहे.

मात्र लोकसभा निवडणुका संपल्यानंतर शिवसेना (Shivsena) नेते खासदार राऊत हा आरोप विसरले का? असं बोललं जात आहे. नाशिक शहराच्या इतिहासात घडलेला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. यामध्ये सर्वच सत्तेतील राजकीय पक्षांनी कमिशनचे लोणी खाल्ल्याचा आरोप करण्यात आला होता. हा आरोप पालकमंत्री दादा भुसे यांना चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे त्यांनी याबाबत तातडीने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता.

शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक अजय बोरस्ते यांच्यावर देखील याबाबत शासनाची पत्रव्यवहार करून काही लाभार्थींना फायदा होईल असे काम केल्याचे आरोप झाला. या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख बोरस्ते आणि भाजपचे नेते गणेश गीते यांनीही आपल्या वतीने खुलासा करीत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शासनाकडे पत्रव्यवहार करून भूसंपादनाबाबत झालेल्या या कामकाजात हातभार लावल्याचे त्यांनी मान्य केले होते.

नाशिक महापालिकेचा मोठा निधी अनावश्यक भूसंपादनासाठी वापरण्यात आला. हे भूसंपादन करताना अनेक नियमांची पायमल्ली झाल्याचा आरोप आहे. अन्य विकासकामे बाजूला ठेवून केवळ भूसंपादनाला महत्त्व देण्यात आले होते. त्यात काही ठराविक बांधकाम व्यवसायिकांना कोट्यवधीचा लाभ झालेला आहे.

एका व्यावसायिकाला लाभ होतो तेव्हा महापालिका पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी देखील कोरडे राहत नाहीत. यामध्ये सत्ताधारी पक्षाचे राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांनी देखील संधीचे सोने केले असावे. त्यामुळे हा गंभीर विषय इथेच संपणार का? या घोटाळ्याचा पुढे पाठपुरावा होणार की नाही? अशी चर्चा आहे. त्यावर शिवसेना नेते खासदार राऊत काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT