Ajit Pawar-Dhananjay Munde
Ajit Pawar-Dhananjay Munde  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अजितदादा त्यावेळी मला म्हणाले होते, ‘हरभजनदेखील मॅच जिंकून देतो!’

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : श्रीरामपूरमधील सभेत अजित पवारांनी (Ajit Pawar) मला त्यांच्या भाषणानंतर बोलण्यास सांगितले. मात्र, प्रोटोकॉलमुळे मी नकार देत होतो. शेवटी अजितदादांनी आदेश दिल्यामुळे मी भाषणाला उभा राहिलो. भाषणात बोलताना मी ‘विराट कोहलीनंतर हरभजनसिंग येऊन खेळतोय, असा संदर्भ दिला. त्यावेळी दादा मागून म्हणाले की, अरे हरभजनदेखील मॅच जिंकून देतो, हे तू विसरू नको, असा किस्सा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सांगितला. (Due to order of Ajit Pawar, I spoke after him in sabha of Shrirampur : dhananjay munde)

सामाजिक न्यायमंत्री मुंडे हे एका मुलाखतीत बोलत होते. ते म्हणाले की, ती श्रीरामपूरची सभा होती. तेथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. रॅली सभास्थळापर्यंत जायची होती आणि दहाच्या आत सभाही संपवायची होती. त्यावेळी अजितदादांनी मला सांगितले की, तू रॅली कर. मी पुढे जाऊन सभा सुरू करतो. मी त्या मोटारसायकल रॅलीबरोबर सभेच्या ठिकाणी गेलो आणि त्यावेळी अजितदादांचे भाषण सुरू झालं होतं.

मी स्टेजवर गेल्यानंतर भाषण संपताच दादांनी मला सांगितले की ‘आता तू भाषण कर.’ त्यावेळी त्यांना म्हटलं की, मी प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे. संघटनेचे सर्व प्रोटोकॉल पाळले पाहिजेत. माझ्या नेत्यांनंतर मला भाषण करणे पटत नाही, त्यामुळे मी भाषणाला नकार देत होतो. पण, त्यांनी आदेशच दिला की, नाही तू भाषण करायचंच. त्यावेळी भाषण करताना मी म्हटलं होतं की विराटनंतर हरभजन येऊन खेळतोय. पण, दादा मागून म्हणाले की, अरे हरभजनदेखील मॅच जिंकून देतो.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणुकीआधी हल्लाबोल यात्रा काढण्यात आली होती. आशूतोष काळे यांच्या कोपरगाव मतदारसंघात हल्लाबोलची दुपारी सभा होती. वातावरण एकदम शांत होते. माझ्या बाजूला दिलीप वळसे पाटील, त्याच्यानंतर सुनील तटकरे आणि अजित पवार बसलेले होते.

वळसे पाटील म्हणाले की ही सभा कशी होणार, लोकांची ऐकण्याची मनःस्थिती दिसत नाही. त्यावेळी मी वळसे पाटील यांना म्हटलं होतं की, तुम्ही म्हणता ना या सभेत जिवंतपणा नाही. मी ही सभा जिवंत करून दाखवतो. माझ्या भाषणाच्या वेळी लोकांनी फक्त टाळ्याच वाजवल्या नाही तर काही लोक उत्स्फूर्तपणे जागेवरून उठून घोषणा देत होते. त्यावेळी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देत वळसे पाटील मला म्हणाले होते की, कमाल केलीस तू. कारण मला नव्हतं वाटत की ही सभा पुन्हा जिवंत होईल म्हणून. वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या शाबासकीची अशीही आठवणी धनंजय मुंडे यांनी कथन केली.

वक्तृत्व कलेबद्दल धनंजय मुंडे यांनी सांगितले की, त्याबाबत मीसुद्धा विचार करतोय, मला एक माणसासमोर बोलणे शक्य नव्हतं. तो मी अनेकांसमोर बोलायला कसं शिकलो. पण एक आहे की, मी अटलबिहारी वाजपेयी, उमा भारती, शत्रुघ्न सिन्हा, नरेंद्र मोदी आणि आताच्या काळात शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या सभांचे नियोजन करत होतो. या सभांचे नियोजन करता करता मी सभेच्या व्यासपीठावर वक्ता म्हणून कधी गेलो, हे मलाही कळलं नाही. एखाद्याचे भाषण मन लावून पाहणे, ऐकणे त्यावर शिकण्याबाबत बरंच काही अवलंबून असते. माझ्या भाषणावर (स्व.) प्रमोद महाजन आणि (स्व.) गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव आहे. माझ्या भाषणात महाजन, मुंडे आणि आर. आर.आबाही दिसतात, असे अनेकजण सांगतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT