Girish Mahajan, Eknath Khadse
Girish Mahajan, Eknath Khadse sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

खडसेंनी ताकद दाखवली; आता वर्चस्व राखण्याचे महाजनांपुढे आव्हान

कैलास शिंदे :सरकारनामा ब्युरो

जळगाव : राज्यातील सत्ता काबिज केल्यानंतर महाविकास आघाडीने तोच पॅटर्न राज्यभरातील विविध ठिकाणच्या निवडणूकांमध्ये वापरला. याच मार्गाने जात महाविकास आघाडीने जळगाव जिल्हा बँकेच्या चाव्याही ताब्यात घेतल्या. या सत्तेमुळे जळगावमध्ये काहीशा कमजोर असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (Ncp), शिवसेना (Shivsena) आणि अत्यंत कमकुवत असलेल्या कॉंग्रेसला (Congress) बळ मिळाले आहे. दुसऱ्या बाजूला भाजपने निवडणूकीवर बहिष्कार टाकला असल्याने त्यांचे मोजमाप होत नाही, मात्र त्यांचा हा कमकवुतपणा ठरला असल्याचे मत व्यक्त होत आहे. पण भाजप खरंच कुमकवत झाला का याचे उत्तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत मिळणार आहे.

'सहकार' हे राजकारणापासून अलिप्त आहे, असे म्हटले जाते. मात्र राजकारणाशिवाय सहकार नाही हे चित्र राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणे जळगावमध्येही दिसून आले आहे. जळगावचे चित्र बघितल्यास राज्यात ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाचीच जिल्हा बँकेवर सत्ता येते. गत निवडणूकीवेळी राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता होती, त्यावेळी तत्कालिन भाजपचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी नेतृत्व करून सर्वपक्षीय यश मिळविले होते. पण त्यात भाजप आणि शिवसेनेचे संचालक जास्त होते. त्यामुळे अध्यक्ष भाजपचा होता, पर्यायाने भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व होते.

आज राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आता भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये डेरेदाखल झालेले एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने जिल्हा बँकवर सत्ता स्थापन केली. खडसेंनी आपल्या नेतृत्वाचे कौशल्य दाखवत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक जागा जिंकून दिल्या. या ठिकाणी सर्व पक्षीय आघाडीचा प्रयत्न झाला मात्र त्याला व्यवस्थितपणे 'शह' देण्यात आला, त्यात राजकीय डावपेच कसे पडले ही गोष्ट सुर्यप्रकाशाएवढी स्वच्छ आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा महाविकास आघाडी विरूध्द भाजप असा संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली होती.

जर हा संघर्ष झाला असता तर, त्यात जय, पराजय झाला असता. त्याचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत उमटले असते. त्यामुळे भाजपने 'बहिष्कार' टाकण्याचा मुलामा देवून एक पाऊल निवडणूकीतून माघार घेतली. यामुळे महाविकास आघाडीला या निवडणूकीतून बळ तर मिळालेच परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस अधिक ताकदवार झाली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही आपले जिल्ह्यात आजही वजन आणि नेतृत्व असल्याचे दाखवून दिले आहे. या निवडणूकांच्या निमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही आपल्या नेतृत्वाचे कसब दाखवून दिले आहे. सोबतच दोन्ही पक्षांसोबत राहिल्यास आपला देखील फायदा असल्याचे काँग्रेसने हेरले आहे.

भारतीय जनता पक्षाला मात्र आता हे मोठे आव्हान असणार आहे. आगामी काळातील जिल्ह्यात होणाऱ्या निवडणूकीत महाविकास आघाडी झाल्यास भारतीय जनता पक्ष आणि पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्यासमोर आता आव्हान असणार आहे. जिल्हा बँकेत न लढून त्यांनी एक पाऊल माघार घेतले आहे, परंतु आगामी काळात जिल्ह्यात होणाऱ्या निवडणूकीतील यशासाठी फायदेशीर होते, हे त्यांना आता दाखवून द्यावे लागणार आहे. आता जिल्हा परिषदेवरील सत्ता राखणं हे भाजपचं आव्हान असणार आहे. पण सध्या तरी जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता आल्यामुळे तीन पक्षांना राजकीय बळ मिळाले आहे हे मात्र निश्चित...!!!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT