Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात झालेल्या बेमुसमी पावसाने सहा हजार हेक्टर केळी नष्ट झाली. चांगला भाव अपेक्षित असताना शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. या संदर्भात महायुती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी महायुतीवर टीकास्त्र सोडले आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे गिरीश महाजन यांसह चार मंत्री आहेत. या मंत्र्यांनी केवळ घोषणाबाजी केल्याची टीका खडसे यांनी केली.
जळगाव जिल्ह्यात चार मंत्री आहेत. चार मंत्र्यांमधील एकही अद्याप केळी उत्पादकांच्या बांधावर गेलेला नाही. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे वगळता कोणीही शेतकऱ्यांना धीर दिला नाही. सत्ताधारी महायुतीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असे सध्याचे चित्र आहे.
गेले चार-पाच दिवस सलग बेमौसमी पाऊस झाला. यामध्ये जळगाव, चोपडा, मुक्ताईनगर, यावल, रावेर आणि पाचोरा या तालुक्यांमध्ये केळी पीक जमीनदोस्त झाले. केळी पिक अंतिम टप्प्यात असताना निसर्गाचे संकट कोसळले.
पिकांना चांगला भाव अपेक्षित होता मात्र ते वाया गेले. उत्पादक शेतकरी अक्षरशा रडकुंडीला आला आहे. पाच सहा हजार हेक्टर वरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा येण्याची गरज आहे. मात्र जिल्ह्यातील एकही मंत्री या शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकले नाही.
सर्वच मंत्री विधानपरिषद निवडणुकीच्या घोडेबाजारात व्यस्त आहेत. मतांच्या घोडेबाजारामध्ये सत्ताधारी मंत्री एवढे रमले की जनतेलाच विसरले. त्यांना केवळ निवडणुका आणि सत्ता यांची चिंता आहे, अशी टीका खडसे यांनी केली.
दरम्यान, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जळगावचे गुलाबराव पाटील आणि संजय सावकारे या दोन मंत्र्यांनी या विषयावर चर्चा घडवली. त्यात विमा कंपन्यांनी तातडीने पंचनामे करावेत. त्यातील तांत्रिक त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना मदत करावी. त्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.