Nashik News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Political News : नाशिक जिल्ह्यातील 'या' गावात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी!; काय आहे कारण?

सरकारनामा ब्यूरो

Nashik News : कोणताही राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. त्यामुळे अशा पुढाऱ्यांना वेशीवरच रोखुन जाब विचारण्याची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी (दि.२१) पासून आमदार, खासदार, मंत्र्यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी गावात प्रवेश करू नये, केल्यास त्यांच्यावर कांदा फेकून निषेध केला जाईल असा ठराव शेतकरी क्रांती मोर्चा, कांदा उत्पादक शेतकरी संघटना व ग्रामस्थांनी केला आहे.

मुंजवाड ग्रामस्थांनी आज ग्रामसभा घेऊन शासन(State Government)विरोधी घोषणाबाजी करत गावबंदीचा निर्णय जाहीर केला.अवकाळी पाऊस व गारपीट या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा आधीच खराब झाला होता, तरीही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने तो चाळीत साठवला, परंतू, त्याला अवकाळीचा फटका बसला असल्यामुळे तो सडू लागला आहे. कांदा अनुदानाची फक्त घोषणाच झाली. अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही.

राज्य शासनाने अवकाळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यासाठी जाहीर केलेले कांदा अनुदान प्रत्येकाच्या बँक खाती जमा होईपर्यंत व नाफेड तर्फे दोन हजार रूपये क्विंटल दराने कांदा खरेदी सुरू होईपर्यंत आमदार,खासदार व कोणत्याही राजकीय(Politics) पुढाऱ्यांना मुंजवाड(ता.बागलाण)या गावात गावबंदी व कुणी प्रवेश केला तर त्यावर कांदाफेक आंदोलन छेडणार असल्याचा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

आमदार खासदार मंत्री विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी मुंजवाड गावात प्रवेश करू नये, केल्यास त्यांच्यावर कांदा फेकून निषेध केला जाईल असा ठराव शेतकरी क्रांती मोर्चा, कांदा उत्पादक शेतकरी संघटना व मुंजवाड ग्रामस्थांनी केला.लवकरच मुंजवाड ग्रामपंचायती चा ही तसा ठराव करून शासनास पाठविनार आहेत. आज गावाच्या चारही दिशांना राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदचे(गांवबंदी) फलक लावण्यात आले आहेत.

सध्या कोणत्याच शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. टोमॅटो, मिरची,कोबी, कोथंबिर,मेथी जुडी रस्त्यावर फेकुन देण्याची वेळ आली आहे.

देशाची अर्थव्यवस्था शेतकऱ्यां(Farmer)च्या हातात असून शेतकऱ्यांचीच दयनीय अवस्था झाली आहे . अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व गावकऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांना गांव बंदी केल्या शिवाय पर्याय नाही, राजकीय पुढाऱ्यांनी शासनाला शासनविरोधी धोरणाचा जाब विचारण्याचे आवाहन शेतकरी क्रांती मोर्चा चे अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी केले.

यावेळी भिकाजी जाधव, वैभव आहिरे, नानाजी जाधव, महेंद्र जाधव,उमेश खैरनार, विनोद जाधव, भगवान जाधव, भास्कर बागुल, योगेश जाधव, काशिनाथ जाधव आदींसह मुंजवाड गावातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव म्हणाले, केंद्र सरकारने नाफेडमार्फत तीन लाख टन कांदा खरेदीची घोषणा केली. मात्र, आजपर्यंत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. कांदा अनुदान जाहीर होऊन दीड दोन महिने उलटूनही शेतकऱ्याच्या बँक खाती दमडी ही जमा झालेली नाही. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT