Ahilyanagar News : केंद्र सरकारने उसाची एफआरपी निश्चित केली असून, ती 10.25 साखर उताऱ्यासाठी 3 हजार 400 रुपये ठरवली आहे. परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक कारखाने 2700 ते 2800 रुपयांच्या भावापुढे जात नसल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
कारखान्यांकडून भावाचे हमीपत्र मिळाले, तरच ऊस तोडू देऊ. यावर तीन हजारांपेक्षा कमी भाव दिल्यास जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतकरी संघटनांनी दिला.
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी, शेतकरी (Farmer) प्रतिनिधी, साखर कारखानदार यांच्या उपस्थितीत ऊस दरावर बैठक झाली. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी 27 साखर कारखान्यांपैकी फक्त 7 साखर कारखानदारांनी भाव जाहीर केले. तर 23 कारखान्यांच्या प्रतिनिधिंनी बैठकीकडे पाठ फिरवली. मोजक्याच कारखान्यांचे कार्यकारी संचालक, तर इतर प्रतिनिधी पाठवले होते.
या बैठकीत हजर असलेले अशोक 2700, काळे 2800, विखे तीन हजार, संगमनेर (Sangamner) 2800, ज्ञानेश्वर 2700, कोल्हे 2800, केदारेश्वर 2700, असा भाव जाहीर केला. जिल्ह्यातील कारखान्यांनी मिळून 2700 ते 2800 रुपये भाव ठरवला आहे, ही कारखानदारांची संघटीत गुन्हेगारी आहे, असा आरोप शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते अभिजीत पोटे यांनी केला.
केंद्र सरकारने 3400 रुपये भाव ठरवला आहे, तो साखर कारखान्यांवर बंधनकारक असताना, तीन हजार रुपयांच्या आत कारखानदार दर देत आहे. बाजूच्या जिल्ह्यातील कारखानदार तीन हजार ते 3400 रुपये भाव देत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशासनानं कमी भाव देणाऱ्या कारखानदारांवर कारवाई न केल्यास जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करू, असा इशारही शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रावसाहेब लवांडे, शेतकरी संघटनेचे अशोक काळे, शेतकरी प्रतिनिधी नानासाहेब पवार, दीपक पटारे, नानासाहेब तागड, रमेश भालके, सोमनाथ गर्जे, कृष्णा सातपुते, संजय वाघ, मेजर महादेव आव्हाड उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हातात साखर कारखान्याचे ऊस दराचे हमीपत्र कारखानदारांनी द्यावे. त्यानंतरच ऊस तोडावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली. गेल्यावर्षीचे पेमेंट देखील कारखान्यांकडे शिल्लक आहे. ते व्याजासह शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. एवढी महत्त्वपूर्ण बैठक असताना, अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदार, खासदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नेतृत्व करायला तयार नाही, असा टोला अभिजीत पोटे यांनी लगावला.
शेतात ऊस तोडणी न करता कारखान्यावर ऊस आणला तर एक हजार ते 1300 रुपये अधिक भाव दिला जातो. तरीही वाहतूक कपात केली जाते. हार्वेस्टर चालक ऊस तोडणीसाठी ६ हजार रुपये मागतात. ऊस तोडणी मजूरांनाही पैसे द्यावे लागतात, जेवणाची व्यवस्था करावी लागते. वजनकाट्यांची पडताळणी झालेली नाहीत. अशा तक्रारी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधिंनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी याची दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.