Onion Export ban Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Onion Export ban Issue : कांदा करणार भाजपचा वांदा? ; निर्यातबंदीच्या निर्णयावरून शेतकरी संघटना आक्रमक!

Arvind Jadhav

Nashik News : कांदा निर्यातबंदी निर्णयाबाबत भाजपकडून शेतकऱ्यांची चेष्टाच सुरू केली असून, कांदा निर्यातबंदी निर्णय मागे घेतल्यानंतर गुलाल उधळणाऱ्या मंत्री भारती पवार आणि सुजय विखे कुठे आहेत? असा सवाल संतप्त शेतकरी संघटनांकडून उपस्थित केला जातो आहे.

केंद्र सरकारने डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केला. परिणामी परदेशात जाणारा कांदा भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होऊन कांद्याचे दर चार हजार रुपयांपासून थेट हजार रुपयांपर्यंत खाली घसरले. त्यात दोन दिवसांपासून कांदा निर्यातबंदी मागे घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्यात. मात्र, केंद्र सरकारने याबाबत कोणतेही नोटिफिकेशन काढले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले की, 'कांदा उत्पादक शेतकऱ्यांची केंद्र शासन सातत्याने फसवणूक करीत आले आहे. कांद्याची गरज आणि उत्पादन याचा ताळमेळ घालण्यापेक्षा सरकार कांद्याचे भाव वाढायलाच नको, याची काळजी घेते. वीस वर्षांपूर्वी शेतकरी कांदा बाराशे रुपये भावाने विकत होता. आजही शेतकरी त्याच भावाने कांदा विकतो.'

तसेच 'वीस वर्षांत प्रचंड महागाई वाढली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो, याची दखलही घेतली जात नाही. याविरोधात कांदा उत्पादन करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांना एकत्रित करण्यावर भर देण्यात येईल. सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवून दिली जाईल,' असे दिघोळे यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनीसुद्धा भाजपवर रोष व्यक्त केला. 'तीन दिवसांपूर्वीच कांदा निर्यातबंदी उठवल्याची बातमी आली होती. भाजपच्या केंद्रीय मंत्री भारती पवार, सुजय विखे पाटील यांनी कांदा निर्यातबंदी उठवल्याबद्दल श्रेय घेण्यासाठी स्तुतीचा गुलाल उधळला. मात्र, गुलाल जमिनीवर पडण्याआधीच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी 31 मार्चपर्यंत कायम आहे, असे स्पष्टीकरण दिले.

यामुळे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम झाले. केंद्र सरकार मतदारांना डोळ्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांचा बळी देण्याचे काम करत आहे. त्याविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. शेतकऱ्यांना सतत फसवत असणाऱ्या त्यांच्या भावनांचा खेळ मांडणाऱ्या या सरकारला निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,' असे जगताप यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लासलगाव बाजार समितीच्या मुख्य इमारतीच्या बैठक हॉलमध्ये विविध शेतकरी संघटना प्रतिनिधींची बैठक पार पडली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या बैठकीत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

निर्यातबंदी त्वरित हटवण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. बैठकीस महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना, छावा क्रांती संघटना, शिवसेना (उबाठा) यासह इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT