Radhakrishna Vikhe Vs Bhanudas Murkute  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Vs Bhanudas Murkute : विखे-थोरातांवर मुरकुटेंचा संताप; म्हणाले, 'शिंदे-पवार-फडणवीस आपलेच'

Pradeep Pendhare

Ahmednagar News : निधी वाटपात पालकमंत्र्यांनी कधी आवड-निवड बघायची नसते. समन्याय पद्धत अवलंबायची असते. पण पालकमंत्री राधाकृष्ण विखे आवड-निवड बघत असल्याने, ते आपल्यासाठी अनुकूल नाहीत.

मंत्री विखे ऐकत नसतील, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आपलेच आहे. त्यांच्याकडे जाऊन प्रश्न सोडवू, असा इशारा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी दिला. तसंच समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे बाळासाहेब थोरातांनी वाटोळे केल्याचा देखील घाणाघात मुरकुटे यांनी केला.

श्रीरामपूर बाजार समितीच्या वार्षिक सभेत भानुदास मुरकुटे यांनी राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर जोरदार टीका केली. "निधी वाटपात आवड-निवड करत असल्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे आपल्यासाठी अनुकूल नाहीत, असे थेट आव्हानच दिले. समन्यायी पाणी वाटपावरून बाळासाहेब थोरातांना सुनावले. हे दोन्ही नेते सत्तेत असताना कायमच अन्याय करत आले असून, सत्तेत राहून त्रास देणार असाल, तर आंदोलनाचे शस्त्र हाती घेण्याचा इशारा देत थेट मुख्यमंत्री शिंदेंकडे जावू", असेही भानुदास मुरकुटे यांनी म्हटले. सभापती सुधीर नवले, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, हेमंत ओगले, ज्ञानेश्वर मुरकुटे आदी उपस्थित होते.

भानुदास मुरकुटे म्हणाले, "विकास निधी वाटपात पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) ऐकत नसतील, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडवणीस यांच्याकडे जाऊन प्रश्न सोडवू. ते आपलेच आहेत. बाजार समितीची निवडणुकीत विखे, ससाणे आणि मी बरोबर येऊन लढलो. सभापती पदासाठी बोलणे होऊनही विखे यांनी शब्द फिरविला. राजकारणातही शब्दाला किमत असते".

श्रीरामपूर बाजार समितीच्या विस्तारासाठी आता जमीन कमी पडत आहे. सार्वजनिक उपक्रमासाठी शेती महामंडळाच्या जमीन देण्याचा अजित पवार यांचा आदेश आहे. येथील जनावरांच्या बाजाराचा जिल्ह्यात नावलौकिक होता. मात्र, इतरांनी अतिक्रमण केल्याने तो बंद पडला. बाजार समितीने गाळे बांधावेत, जनावरांचा बाजार सुरू करावा यासाठी लागणारी जागा मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू. कुणी अडवणूक करत असेल, तर आंदोलनाच्या माध्यमातून समोरे जाण्याचा इशारा भानुदास मुरकुटे यांनी दिला.

गाळे वाटपात गैरव्यवहाराचा आरोप

अशोक कारखान्याने कधी लाखाच्या पुढे जाहिराती दिल्या नाहीत. मात्र बाजार समितीने गतकाळात थेट 21 लाखापर्यंत जाहिराती वाटल्या. त्यांच्या काळात सव्वादोन लाखाच्या पुढे गाळे गेले नाहीत. मात्र, (कै.) जयंत ससाणे यांच्या सूचनेनुसार गाळे विक्रीच्या जाहिराती देऊन हेच गाळे थेट 23 लाखाला दिल्याचा आरोप या सभेत करण्यात आला. गाळे वाटपावर चौकशीची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली.

समन्यायी पाणी कायद्यामुळे वाटोळे

समन्यायी पाणी वाटपाला बाळासाहेब थोरात यांनी मंजुरी दिली. या कायद्याने आपले वाटोळे केले. पूर्वी भंडारदरा भरले की, शेतकरी उसाचे टिपरे दाबत. आता जायकवाडी भरण्याची वाट पाहवी लागते. पाण्याबाबत राधाकृष्ण विखे-बाळासाहेब थोरात नेहमी एकत्र असतात. पूर्वी शेती व पिण्याचे पाण्याचे एकत्र आवर्तन होते. आता दोन्ही आवर्तने स्वतंत्र झाली आहेत. श्रीरामपूर पालिका व बेलापूरचा साठवण तलाव भरला की पिण्याचे आवर्तन बंद होते. मात्र, दोन्ही आवर्तनात हे तिकडे शेती फुलवतात, असा आरोप भानुदास मुरकुटे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT