Chandrakant Raghuvanshi, Dr. Vijay Gavit
Chandrakant Raghuvanshi, Dr. Vijay Gavit sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

माजी आमदार रघुवंशींनी असा उधळला गावितांचा प्लॅन

धनराज माळी

नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समितीतील मिळालेले यश हे पुन्हा माजी आमदार शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) यांचेच नंदुरबार तालुक्यावर वर्चस्व सिद्ध करणारे ठरले आहे. त्यामुळे काँग्रेस (Congress) सोडल्यानंतर आजारपणामुळे कमी झालेल्या संपर्कातून त्यांची पकड काहीशी सैल झाल्याचे चित्र होते. मात्र या निवडणुकीत त्यांनी पुन्हा प्रतिष्ठा पणाला लावून केलेले काम व त्यांना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मिळालेली साथ नक्कीच मोलाची ठरली आहे.

नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात पक्षा पेक्षाही व्यक्तीला महत्त्व आहे. जिल्ह्याच्या राजकारणात रघुवंशी व डॉ. विजय गावित गट अशीच राजकीय ओळख आहे. ते ज्या पक्षात तो पक्ष मोठा, असे त्यांनी यापूर्वीही अनेकदा सिद्ध केले आहे. या दोन्हीही नेत्यांची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड आहे. त्यामुळे तिसरा कोणीही आपले वर्चस्व सिद्ध करू शकत नाही, असे चित्र पूर्वीप्रमाणेच आताही आहे. हे नेते ज्या पक्षात जातात, तेथे त्यांची कार्यकर्त्यांची भक्कम फळी सोबत असते. मध्यंतरीच्या काळात थंडावलेला रघुवंशी विरुद्ध गावित संघर्ष या निवडणुकीतून पुन्हा स्पष्ट झाला आहे.

या दोन्ही नेत्यांनी आजपर्यंत आपापल्या वर्चस्वासाठी संघर्ष केला आहे. गावित यांनी राष्ट्रावादी काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करताच जिल्ह्यात भाजप 'नंबर वन'चा पक्ष बनला. कारण राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची फळी गावित यांच्यासह भाजपमध्ये सहभागी झाली. त्यामुळे भाजपचे वर्चस्व जिल्ह्यात वाढल्याचे बोलले जाते. त्याचप्रमाणे माजी आमदार रघुवंशी यांचीही कार्यकर्त्यांची स्वतंत्र भक्कम फळी आहे. त्यांचा शब्द कार्यकर्त्यांसाठी आदेश असतो. मागे आजारपण व त्यातच काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांचा जनसंपर्क कमी झाला होता. संपर्क कमी झाला असला तरी त्यांना मानणाऱ्या गटाने त्यांना सोडले नाही. रघुवंशी यांनी शहराच्या राजकारणात लक्ष पुन्हा केंद्रित केले.

शहावरील त्यांची पकड कायम आहे. ती कोणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेलाही सुगीचे दिवस आले. जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांनी वाढविलेल्या शिवसेनेला रघुवंशी यांच्यामुळे पाठबळ मिळाले. त्यातूनच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आल्या. त्यात रघुवंशी यांनी कंबर कसत जिल्हा पिंजून काढला. त्यात शिवसेनेची जिल्हा परिषदेत एकही जागा नसताना सात जागांवर विजय मिळविला होता. तर नंदुरबार पंचायत समितीत नऊ जागा ताब्यात घेतल्या होत्या.

त्यानंतर आज झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या गेलेल्या दोन जागा शाबूत ठेवत भाजपच्या तावडीतून मांडळ गट ताब्यात घेतला, तर खोंडामळी गटात निसटता पराभव झाला. पंचायत समितीत शिवसेनेचे चार उमेदवार पुन्हा निवडून आणले. त्यामुळे पंचायत समितीत सत्तांतर अटळ आहेच. मात्र शिवसेनेला पराभूत करून जिल्हा परिषदेत नवीन सत्ता स्थापनेचे गणित उधळून लावत उलट एक जागा वाढवून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मात्र या निवडणुकीतून जिल्ह्यातील जनतेला रघुवंशी विरुद्ध गावित असा संघर्ष पुन्हा पाहावयास मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT