Nashik Politics : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन हेच संकटाच सापडले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात तिथे उपस्थित असलेल्या महिला वन अधिकाऱ्याने त्यांच्या भाषणावर आक्षेप घेतला आहे.
वन कर्मचारी माधवी जाधव यांनी, 'संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात? असा थेट सवाल जाहीरपणे महाजन यांना केला. यावेळी कार्यक्रमस्थळी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. भर सभेत उभे राहून महाजन यांना संबधित महिला कर्मचाऱ्याने सवाल केल्याने गोंधळ निर्माण झाला. एवढ्यावरच न थांबता वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
या घटनेनंतर अखेर गिरीश महाजन यांनी सविस्तर भूमिका मांडत खुलासा केला असून दिलगीरी देखील व्यक्त केली आहे. महाजन म्हणाले, मला आज खूप वाईट वाटले. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जपणारा आहे. गेल्या ४० वर्षांपासून मी प्रत्येक जयंतीमध्ये पुढाकार घेतो. इतर नेते केवळ हार घालून जातात, पण मी प्रत्यक्ष सहभागी असतो. मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवणाला बसतो, मी चाळीस वर्षात अंगात निळा शर्ट घातला नाही असे कधी झाले का? मी दलितांच्या पंगतीत बसून जेवणारा माणूस असल्याचं महाजन म्हणाले.
जामनेरमध्ये बाबासाहेबांचा मोठा पुतळा मीच उभा केला आहे. पण मी मी चाळीस वर्षात एकदा पण असे केले नाही. मी मातंग समाजासाठी, वाल्मिकी समाजासाठी जातो, त्यांच्या लग्न कार्यात सहभागी होतो. मी संघाच्या मुशीत वाढलो असलो तरी माझे राजकारण सर्वसमावेशक असे आहे. जामनेरमध्ये सर्व नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य निवडून येतात, यात सर्व समाजाचा वाटा आहे. आम्ही शाम बडोदे यांना तिकीट दिले, हे आमचे सर्वसमावेशक राजकारण असल्याचं महाजन यांनी पटवून सांगितलं.
मी कधीही जातीपातीत भेदभाव केला नाही. पण आता लोक ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी करत आहेत, पण हे कशासाठी? अनावधानाने माझ्याकडून नाव घ्यायचे राहिले. माझा काही मुद्दाम नाव डावलण्याचा हेतू नाही. मी भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणालो. पण बाबासाहेबांचे नाव राहून गेल्याने मी दिलगीरी व्यक्त करतो. मला माहीत नाही, त्या भगिनी कोण आहेत? पण समाजात समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये अशी विनंती गिरीश महाजन यांनी केली.
डॉ. प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
आज नाशिकमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजनच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव (वनरक्षक) महिलेसोबत फोनवर बोललो. यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला. मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्य अट्रोसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल. आरएसएस-भाजपाकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय. भाजप आणि गिरीश महाजनच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. अशी एक्स पोस्ट वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
माधवी जाधव काय म्हणाल्या?
मंत्री महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या बाबासाहेबांचे नाव वगळणे ही मोठी चूक आहे. त्यांचे नाव भाषणात का नाही? मला सस्पेंड केलं तरी चालेल, मी माती काम करीन पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. हे पालकमंत्री देखील संविधानामुळे आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया माधवी जाधव यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.