Girish Mahajan News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नाशिकला शेतकरी समस्यांबाबत अक्रोश मोर्चा काढला. राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफी न केल्यास मोठे शक्ती प्रदर्शन होईल, असा इशारा दिला होता. खासदार नेत्या सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावे. महिनाभरात शासनाने कर्जमाफी करावी. अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देऊ नका, असा इशारा दिला होता.
यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खासदार सुळे यांना उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत होता. तेव्हा त्यांनी काय केले? शेतकऱ्यांचे प्रश्न का नाही सोडवले? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे विरोधकांना आता मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. राजकारणासाठीच हे सर्व मोर्चे आहेत. राज्यातील भाजपचे सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहिले आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत मदत केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन नेहमीच तत्पर असते.
शेतकरी आणि राज्यातील जनतेचा महायुती सरकारवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच सरकारच्या धोरणांवर त्यांचा विश्वास आहे. सरकारचे प्रतिनिधी आणि भाजपचे कार्यकर्ते जनतेत जाऊन काम करीत असतात.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र निवडणुका जवळ आल्याने जागा झाला आहे. या पक्षाचे नेते सत्तेत होते. काही काळ उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्री होते. या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी काय केले? हे जनतेला माहित आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Congress) आव्हानाला आम्ही गांभीर्याने घेत नाही. राज्य शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर आहे. पिकांच्या नुकसानी पासून तर विविध अडचणीत शासनाने शेतकऱ्यांना मदत केली आहे.