Ekanth Shinde, Hemant Godse, Shantigiri Maharaj Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hemant Godse News: भाजपने शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना वाऱ्यावर सोडले का?

Sampat Devgire

BJP-Shantigiri News: पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज संपला. नाशिक मध्ये प्रचार संपताना शांतिगिरी महाराज यांनी एक गंभीर विधान केले. या विधानामुळे भारतीय जनता पक्ष संशयाच्या भोवऱ्यात सापडला.

शांतिगिरी महाराज हे नाशिकचे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांना विविध धार्मिक संस्थांनी पाठिंबा दिला आहे. त्यांच्या प्रचारासाठी राज्यभरातील त्यांचे अनुयायी नाशिक शहरात दाखल झाले आहेत. आज प्रचाराची सांगता असल्याने शांतिगिरी महाराज यांनी शहरात प्रचार फेरी काढली. या प्रचार फेरी दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी केलेल्या दाव्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

शांतिगिरी महाराज यांची प्रचार फेरी महायुतीचे उमेदवार गोडसे यांच्या प्रचार कार्यालयासमोरून गेली. यावेळी शांतिगिरी यांनी आपल्या गळ्यातील हार गोडसे यांच्या कार्यालयासमोर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कट आउट कडे भिरकावला. त्यांच्या अनुयायांनी तो हार पंतप्रधान मोदी यांच्या कटआउट जीला घातला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील केली. त्यामुळे या घटनेतून त्यांना काय संदेश द्यावयाचा होता हे स्पष्ट झाले नाही. मात्र यावर राजकीय गोंधळ सुरू होता.

यावेळी शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) म्हणाले की, मी जिंकण्यासाठीच निवडणूक लढवीत आहे. मला भारतीय जनता पक्षासह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा आहे. माझे अनेक अनुयायी विविध पक्षांमध्ये आहेत. त्यामुळे जिंकण्यासाठीच आम्ही लढत आहोत, असा दावा केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) उमेदवार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे तसेच भारतीय जनता पक्षाचे समर्थन अपेक्षित आहे. महायुतीच्या या घटक पक्षांनी शेवटच्या टप्प्यात परस्परांतील समन्वय वाढवला. त्यामुळे प्रचारात चांगली आघाडी देखील मिळाली. असे असले तरी भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी प्रचारात अंग चोरून वावरत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधान आले होते.

शांतिगिरी यांच्या विधानाने भारतीय जनता पक्ष नेमका कोणा मागे, असा प्रश्न निर्माण झाला. त्याला तशी कारणे देखील आहेत. गोडसे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून भाजपने खूप जोर लावला होता. शुक्रवारी (ता.17) भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आम्ही शांतिगिरी महाराज यांच्या नियमित संपर्कात आहोत. त्यांचे विविध मतदार संघात अनुयायी आहे. त्यांचा भाजपला फायदा व्हावा, म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. हिंदुत्ववादी मतांमध्ये विभागणी होऊ नये म्हणून शांतिगिरी यांनी माघार घ्यावी म्हणून प्रयत्न केले होते, असे सांगितले.

शांतिगिरी महाराज यांनी भारतीय जनता पक्षाविषयी केलेल्या विधानात किती सत्यता आहे हे त्यांनाच माहीत. राजकीय डावपेचाचा भाग म्हणून देखील त्यांनी असे विधान केले असावे. मात्र, यामुळे खासदार हेमंत गोडसे यांची झोप उडाली.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांत देखील आपण नेमके कोणाच्या बाजूने असा राजकीय गोंधळ होऊ शकतो. थोडक्यात शांतिगिरी महाराज यांनी हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप यांच्याबाबत विधान करून एकाच दगडात दोन पक्षांची शिकार केली आहे. त्यामुळे नाशिक मतदार संघात प्रचार समता समता एक नवा राजकीय गोंधळ सुरू झाला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT