Rupali Chakankar News, Nashik latest Marathi News
Rupali Chakankar News, Nashik latest Marathi News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

रूपाली चाणकरांनी ठणकावले, ...तर सरपंचाचे पद रद्द करू!

Sampat Devgire

नाशिक : शहरी भागाच्या (Nashik) तुलनेमध्ये ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षिततेचे (Womens safety) प्रश्‍न गंभीर असतात. यासाठी पोलिस (Police) आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात चर्चासत्र, कार्यशाळा घेत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे असले तरी नाशिक शहरात एक बालविवाह झाला. येत्या काळात एकही बालविवाह होणार नाही, असा विश्‍वास व्यक्त करीत, ग्रामीण भागातील बालविवाहाचे प्रमाण रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आढावा बैठकीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सांगितले. (Womens commission president rupali chakankar visit Nashik)

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये महिला सुरक्षितेतसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आयोगाच्या सदस्या व माजी आमदार दीपिका चव्हाण, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त संजय बारकुंड, अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौघुले आदी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती चाकणकर म्हणाल्या, नाशिक शहर पोलिस महिला सुरक्षेसाठी जागरूक असून निर्भया पथक, भरोसा सेल, दक्षता समिती आदी उपाययोजना यशस्वीरीत्या राबविल्या आहेत. विशेष म्हणजे महिलांसंदर्भातील सायबर गुन्हेगारीविषयक नाशिक शहर पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शहरासाठी १०९१, ग्रामीणसाठी ११२ तर सायबरसाठी १०९३ हे टोल फ्री क्रमांक असून, त्यावर संपर्क साधला तर अवघ्या काही मिनिटात मदत मिळू शकेल.

पोलिसांच्या वेगवेगळ्या सुविधांचा लाभ महिला घेत आहे. याविषयी प्रबोधन करण्याची जबाबदारी विधी प्राधिकरणावर देण्यात आली आहे. मागील दोन वर्षातील कोरोना काळात बालविवाह मोठया प्रमाणावर झाले. ते रोखण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा चांगल्या पद्धतीने राबविली. शहरात हे प्रमाण कमी असले तरी ग्रामीणमध्ये जास्त आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण कमी व्हावे, यासाठी समित्या गठित करण्यात आल्याचे श्रीमती चाकणकर यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी महिला पोलिस कर्मचारी सरला खैरनार, ज्योती मेसाट यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

तर पद रद्द होणार

ग्रामीण भागातील बालविवाह रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक याच्या सहयोगातून समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. तरीही बालविवाह होत असल्याचे सिद्ध झाल्यास सरपंच पद रद्द करण्यात यावे, अशी शिफारस राज्य शासनाकडे केल्याचे श्रीमती चाकणकर यांनी सांगितले. नवीन राज्य सरकारही हा प्रस्ताव पुन्हा दिला जाईल, असेही चाकणकर यांनी सांगितले. दरम्यान, सीमावर्ती भागातील कोल्हापूर, सोलापूरसह कर्नाटकलगतच्या ग्रामीण भागात बालविवाह मोठ्याप्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले असून, त्याबाबत उपाययोजना सुरू आहेत.

१०९१ शी संपर्क झालाच नाही

शहरासाठी टोल फ्री क्रमांक असलेल्या १०९१ यावर संपर्क साधूनही साधला जात असल्याची बाब रूपाली चाकणकर यांच्या निदर्शनास आणून दिली असता, त्यांनी स्वत: संपर्क साधला असता त्यांनाही तोच अनुभव आला. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांना संपर्क साधावयास सांगितले असता, त्यांचा संपर्क मात्र झाला. असे असले तरी याबाबत श्रीमती चाकणकर यांनी सूचना देत संपर्क झाला पाहिजे असे नियोजन करण्यास सांगितले. तसेच, विद्यार्थिनी, महिलांनीही छेडाछाडी, अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या १०९१, १०९३, ११२ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहनही श्रीमती चाकणकर यांनी केले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT