Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar : अजितदादा म्हणाले; 'सिर्फ नाम ही काफी है, वायरमन आला की सांगायचं'!

Jagdish Patil

Nashik News, 08 August : राज्यातील शेतकऱ्यांना आता शेतीच्या वीज बिल भरावे लागणार नाही. त्यामुळे आतापर्यंत आलेल्या शेतीच्या पंपाचे बिल भरण्याची गरज नाही. वीज कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आलाच तर त्याला सांगा अजितदादाने सांगितलंय, असं वक्तव्य करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. ते दिंडोरी येथील जनसन्मान यात्रेत बोलत होते.

महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली. मात्र, सरकारने फक्त बहि‍णींचा विचार केला, त्यांनी लाडक्या भावासाठी काहीचं दिलं नाही, अशी टीका विरोधकांनी करायला सुरुवात केली.

यानंतर राज्यशासनाने पदवीवर आणि बारावी पास तरुणांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा करत आम्ही भावांसाठीही काहीतरी देतोय हे दाखवण्याचा प्रयत्न केला. अशातच आता अजितदादांनी शेतकरी भावांसाठी देखील आपण मोठी घोषणा केल्याचं जनसन्मान यात्रेत बोलताना सांगितलं. आम्ही लाडक्या भावांसाठीही योजना सुरु केली आहे.

त्यामुळे आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना (Farmer) शेतीचं वीज बिल भरावं लागणार नाही. आतापर्यंत थकीत असणारी बिल भरण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या सौरपंप योजनेमुळे इथून पुढे शेतकऱ्यांना वीजेवर अवलंबून रहावे लागणार नाही. सौरउर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता शेतीला पाणी देता येईल. शिवाय या योजनेचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

वायरमन आला तर माझं नाव सांगा

त्यामुळे ऐन विधानसभेच्या (Assembly Election) तोंडावर आता अजित पवारांनी राज्यातील शेतकऱ्यांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. शिवाय यावेळी दादांनी शेतकऱ्यांना कोणी वायरमन विज बिल थकलं म्हणून विजेचं कनेक्शन कापण्यासाठी आला तर त्याला सांगा, 'अजितदादाने सांगितलंय', अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, अजितदादांनी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) पुढील पाच वर्ष सुरु राहणार असल्याचा शब्द उपस्थित महिलांना दिला. ते म्हणाले, "मी 10 वर्षे राज्याचा अर्थमंत्री राहिलो आहे, मी 10 अर्थसंकल्प मांडले आहेत. त्यामुळे कुठे बचत करुन योजनेला पैसे देता येतात, ते मला माहिती आहे. विरोधक लाडकी बहीण योजना बंद होणार असं सांगत आहेत. मात्र, पुढील पाच वर्षे ही योजना सुरु राहील, हा अजितदादाचा वादा आहे."

तसंच 17 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होतील, मी कालच 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आलो आहे. ते पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. या पैशातून स्वत:साठी काहीतरी घ्या. लाडक्या बहि‍णींनी पैसे खर्च केल्यास बाजारपेठेला उठाव मिळेल, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT