RPI Ramdas Athawale On Mahayuti Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

RPI Ramdas Athawale On Mahayuti : महायुती खबरदार, सन्मानानं घ्या, नाहीतर परिणाम भोगा; रिपाई आठवले गटाचा इशारा

Pradeep Pendhare

Ahmednagar News : "लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला महायुतीत सन्मानाची वागणूक मिळाली नाही, त्याचे परिणाम भोगावे लागले. आता विधानसभा निवडणुकीत सन्मानाने संपूर्ण राज्यात 12 जागा मिळाल्या पाहिजे, नाहीतर रिपाई आठवले गटाला गृहीत धरू नका", असा इशारा पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांनी दिला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत महायुतीचा ज्या कारणांमुळे पराभव झाला, त्यावर चर्चा झाली. महायुतीत रिपाई आठवले गटाला सन्मानाची वागणून मिळाली नाही. रिपाई गटाने महायुतीचे प्रामाणिकपणे काम केले आहे. आता सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

विजय वाकचौरे यांनी रिपाई आठवले गट हा महायुतीमधील घटक पक्ष असताना, देखील सत्तेतील सहभागापासून वंचित राहिला. तरी महायुतीमध्ये सन्मानाची वागणूक दिली जात नाही. आता सत्तेत वाटा हवा आहे. लोकसभा निवडणुकीत रिपाईला सन्मानाची वागणूक मिळाली नाही, म्हणून आंबेडकरी समाजाने महायुतीच्या उमेदवारांवर रोष काढला, परिणामी अहमदनगर दक्षिण लोकसभा आणि शिर्डीचा जागा गमवावी लागल्याचे सांगितले.

"महाराष्ट्रात विधानसभेसाठी आरपीआय आठवले (Ramdas Athawale) गटाला 12 जागा सोडाव्या, यामध्ये एक श्रीरामपूरच्या जागेचा समावेश असणार असून, तेथून बौद्ध उमेदवार दिला जाणार आहे. महायुतीत सत्तेत सहभाग आणि सन्मानाची वागणूक न मिळाल्यास वेगळी वाट धरू, वेळप्रसंगी स्वतंत्र पर्याय उभा करू", असा इशारा देखील विजय वाकचौरे यांनी दिला.

कार्यकारिणी बरखास्त

श्रीकांत भालेराव यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्यानुसार अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून सुनील साळवे काम पाहणार आहे. ऑक्टोबरमध्ये पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याच सांगितले.

महायुतीत रिपाई आठवले गटाला आता धोरणात्मक निर्णयांमध्ये सहभागी करून घेतले पाहिजे. हे करताना यात विश्वास हवा. रिपाईला यापुढे गृहीत धरून चालता येणार नाही. मान-सन्मान न मिळाल्यास रिपाई आपले राजकीय अस्तित्व दाखवून देईल, असा इशारा देखील भालेराव यांनी दिला. विजय बांबळ, किरण दाभाडे, विवेक भिंगारदिवे, अजय साळवे, नाथा भिंगारदिवे, रमेश गायकवाड, महादेव मगरे उपस्थित होते.

मंत्री आठवले नगर दौऱ्यावर

महायुतीच्या पुढाकारातून जिल्हाव्यापी संविधान सन्मान महामेळावा 26 ऑगस्टला नगरमध्ये होणार आहे. आमदार संग्राम जगताप अध्यक्षस्थानी राहतील. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी खासदार जोगेंद्र कवाडे तसंच विधान परिषदेवर शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आंबेडकरी समाजावतीने नागरी सत्कार होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT