Amit Shah & Jayant Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jayant Patil Politics: मंत्री मंडळाच्या बैठकीत चर्चा नव्हे भांडणे होतात?, जयंत पाटील यांचा दावा!

Sampat Devgire

Patil on Shah News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत भाष्य केले. त्यांच्या या दौऱ्यामुळे भाजपच्या राज्यातील नेत्यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह असल्याचा त्यांचा दावा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सध्या नाशिकला आहे. यानिमित्त खासदार अमोल कोल्हे आणि श्री पाटील यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडत आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादीची यात्रा एकाच दिवशी आज नाशिकला आहे.

केंद्रीय गृहमंत्री शहा यांना लोकसभेतील निवडणूक निकालाचा चांगलाच धक्का बसलेला आहे. भारतीय जनता पक्ष राजकीय दृष्ट्या अत्यंत सजग झाला आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टाकली आहे. परंतु या दोन्ही नेत्यांवर त्यांचा विश्वास नाही, असा दावा करीत पाटील यांनी भाजपला डिवचले.

सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले भाजप नेते शाह भाजपच्या पराभवाची चाचपणी तर करीत नाही ना? पक्षातील नेत्यांना या पराभवाची भीती वाटू लागली आहे की काय, असे दिसते, अशी बोचरी टिका पाटील यांनी केली.

गेल्या दोन दिवसांपासून शिवस्वराज्य यात्रा नाशिकमध्ये आहे. नागपूरचा दौरा आटोपल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नाशिकला येत आहेत. त्यानंतर ते कोल्हापूरला जातील. त्यांचा हा दौरा निवडक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आहे.

उत्तर महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची स्थिती काय असेल, यावर विचारमंथन या बैठकीत अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्रात ४७ मतदारसंघ आहेत. त्याचा राजकीय आढावा अपेक्षित आहे. त्यात पदाधिकारी खरोखर वास्तव माहिती सांगण्याचे धाडसकिती करतील हा चर्चेचा विषय आहे.

खरेतर पक्षाने केलेल्या सर्व्हेक्षण आणि अभ्यासातील तपशील पक्षाकडे आहे. नागपूर येथील बैठकीत झालेल्या चर्चेच्या बातम्यांवरून किती पदाधिकारी या नेत्यांपुढे सत्यकथन करू शकतील, अशी देखील दबक्या आवाजात चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि राज्यातील विविध नेते मंत्री भाजपच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात जाऊन चाचपणी करीत आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांना प्रश्न, उत्तरे आणि राजकीय आरोप करणारच यात शंका नाही.

या पार्श्वभूमीवर श्री पाटील यांनी भाजप जिव्हारी लागतील अशी सूचक विधाने केली आहेत. सध्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय काम होते? हा उत्सुकतेचा विषय आहे. कारण लोकप्रिय योजनांची घोषणा करता करता तिजोरी रिकामी झाली आहे.महसूल मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान खडाजंगी झाली.

सरकारची तिजोरी साफ झाली. त्यामुळे अर्थमंत्री अनेक प्रस्ताव नाकारत आहेत.आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा किंवा प्रस्तावांवर माहिती आणि संवाद नाही तर भांडणेच होणार, असा पाटील यांचा दावा होता.

एकंदरच भाजपच्या विधानसभा निवडणूक आढावा बैठक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रा या दोन्हींच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीतील खडाखडी दिसू लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT