Vikram Gokhale & Kangna Ranawat
Vikram Gokhale & Kangna Ranawat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

कंगणाची बाजू घेणारे अभिनेते गोखलेंना भारतरत्न द्या!

Sampat Devgire

येवला : केंद्र सरकारने नुकताच पद्मश्री हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार बहाल केलेल्या कंगणा राणावत या अभिनेत्रीने बहुजनांनी लढून मिळविलेल्या स्वातंत्र्याविषयी मुक्ताफळे उधळली. त्याचे जाहीर समर्थन अभिनेते विक्रम गोखले यांनी करावे, याचे अजिबात वाईट वाटण्याचे कारण नाही. गोखले यांना भारत सरकारने शक्य तेवढ्या लवकर भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करावा, अशी विशेष मागणी राष्ट्र सेवा दलाचे राज्याचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे (Prof. Arjun Kokate) यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रा. कोकाटे म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली लक्षावधी बहुजन स्री-पुरुष नागरिकांनी १९४७ मध्ये मिळविलेले स्वातंत्र्य एक आंतरराष्ट्रीय अभूतपूर्व घटना होती. स्वातंत्र्याचा हा देदीप्यमान इतिहास सर्वश्रुत आहे. असे असतांना असे दुर्दैवी प्रकार घडतात याचे आजच्या सत्ताधाऱ्यांचे धोरण व एजेंडा विचारात घेता आश्चर्यजनक नाही.

ते म्हणाले, १९४७ साली आपल्या भारत देशाला अनेकांनी इंग्रजांच्या लाठ्या-काठ्या खात, छातीवर गोळ्या झेलीत,तुरुंगात खितपत पडत स्वातंत्र्य मिळवून दिले.अनेक सामान्य माणसांनी आपल्या घरादाराची पर्वा न करता स्वातंत्र्य संग्रामात उड्या घेतल्या, म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. याविषयी अपशब्द वापरणाऱ्या राणावत यांची ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासारखे पाठिंबा देतात, तेव्हा ते एका विशिष्ट विचारसरणीचे समर्थन असते. या मंडळींच्या मनात एकूणच बहुजन समाजाविषयी जो आकस असतो. तो यानिमित्ताने किंवा जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा ते परिणामांची तमा न बाळगता खुलेआम व्यक्त करीत असतात.

या मंडळींना सत्तेबरोबरच एका विचारसरणीचा कायम छुपा पाठिंबा असतो. नथुराम गोडसेने केलेला महात्मा गांधी यांचा खून असो वा स्वातंत्र्य संग्रामात धारातीर्थी पडलेल्या स्वातंत्र्य सैनिकाचा अवमान असो त्यांना काहीच फरक पडत नाही. शिवाय गोखले यांनी हे समर्थन पुणे येथील त्यांच्या सन्मान सोहळ्यात केले. या गोष्टीला एक वेगळे महत्त्व आहे. ते खुलेआम भडकलेल्या महागाईचे समर्थन करतात. कारण त्याची झळ त्यांना कधीच बसत नाही, हे वास्तव नजरेआड करून चालणार नाही.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपासून तर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यापर्यंतचा इतिहास ताजा आहे. पण आता विक्रम गोखले यांच्यासारखे लोक सुद्धा या देशाच्या स्वातंत्र्याबद्दल अशी बेताल वक्तव्य करीत असतील तर महाराष्ट्रातील पुरोगामी-परिवर्तनवादी चळवळीला त्याची गंभीर दखल घ्यावी लागेल, असा इशाराही कोकाटे यांनी दिला आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT