Lal Nishan And Communist Party 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lal Nishan And Communist Party merger : देशात मोठी राजकीय घडामोड; लाल निशाण पक्षाचं 'भाकप' लिबरेशनमध्ये 'विलय'

Lal Nishan Party will officially merge Communist Party of India in a ceremony to be held at Shrirampur Ahilyanagar : अहिल्यानगर श्रीरामपूर इथं लाल निशाण पक्षाचं भाकप लिबरेशनमध्ये विलयाचा ऐतिहासिक सोहळा होणार आहे.

Pradeep Pendhare

Lal Nishan CPI unity : डाव्या चळवळीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून गणल्या जाणाऱ्या लाल निशाण पक्षाचं भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशनमध्ये विलयाचा ऐतिहासिक सोहळा 31 मे रोजी श्रीरामपूर इथं होणार आहे.

श्रीरामपूरच्या गोविंदराव आदिक नाट्यगृहात होणाऱ्या या ऐक्य परिषदेला देशभरातील डावे नेते, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. याच दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा सोहळा चौंडी (ता. जामखेड) इथं होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू येणार आहे. या दोन्ही घडामोडी एकाच दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे या दोन्ही सोहळ्याकडे देशाचं लक्ष असणार आहे.

या ऐक्य परिषदेला भाकप लिबरेशनचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य, खासदार राजाराम सिंग, आमदार शशी यादव आणि कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते शंकर यांची उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) डावे नेते उदय भट, बाळासाहेब सुरुडे, आनंदराव वायकर, राजेंद्र बावके, शरद संसारे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

1942च्या चलेजाव आंदोलनात कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिकेला विरोध करत स्वतंत्र कार्यक्षेत्र तयार करण्याच्या उद्देशाने लाल निशाण पक्षाचा जन्म झाला. स्वातंत्र्य चळवळीत एस. के. लिमये, यशवंत चव्हाण आणि भाऊ फाटक यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाने स्वतंत्र विचारधारा उभी केली. नंतर नवजीवन संघटना आणि कामगार (Worker) किसान पक्षाच्या माध्यमातून चळवळीला बळकटी मिळाली.

भ्रष्टाचारविरोधी लढे

लाल निशाण पक्षाने गेल्या सात दशकांत महाराष्ट्रात श्रमिक, शेतकरी, दलित, महिला आणि आदिवासी चळवळींमध्ये सक्रिय भूमिका बजावली. विविध जनआंदोलने, विशेषतः गिरणी कामगारांचे संघर्ष, साखर कारखान्यांतील भ्रष्टाचारविरोधी लढे, ऊस तोडणी मजुरांचे प्रश्न, जलसंपत्ती व पुनर्वसनाचे मुद्दे या क्षेत्रात भरीव कार्य केले.

'भाकप'चे योगदान

भाकप लिबरेशन पक्षाने बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळसारख्या राज्यांमध्ये कामगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला चळवळींमध्ये महत्त्वपूर्ण काम केले. 2014नंतर देशात वाढत्या फॅसिस्ट प्रवृत्तींना रोखण्यासाठी त्यांनी ‘इंडिया’ आघाडीसह अनेक लोकशाही मंचांवर संघर्ष उभा केला. सध्या पक्षाचे दोन खासदार आणि बारा आमदार असून, अनेक राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व आहे.

ऐक्याची गरज व महत्त्व

लाल निशाण पक्ष व भाकप माले लिबरेशन गेल्या काही दशकांपासून विविध जन आघाड्यांमध्ये एकत्र काम करत होते. या दोन्ही पक्षांची कार्यसंस्कृती, वैचारिक भूमिका आणि राजकीय दिशा यामध्ये सुसंगती असल्याने एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात लोकशाही, समता व सामाजिक न्याय टिकवण्यासाठी डाव्या चळवळीचे ऐक्य हे काळाची गरज असल्याचे संयोजकांचे म्हणणे आहे.

कार्यक्रमाचे स्वरूप

31 मे रोजी होणाऱ्या ऐक्य परिषदेत सकाळी उद्घाटन सत्रात प्रमुख नेत्यांची भाषणे होतील. दुपारी प्रतिनिधी सत्र होईल ज्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील 700 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सायंकाळी समारोप सत्रात औपचारिक 'विलय' जाहीर होईल. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही होणार असून ‘जनशक्ती’ या विशेष अंकाचे प्रकाशन केले जाईल.

फॅसिझम विरोधातील लढा

लाल निशाण पक्षाचा भाकप लिबरेशनमध्ये विलय ही केवळ संघटनात्मक घडामोड नसून, ती देशासह महाराष्ट्रातील डाव्या चळवळीच्या पुनर्रचनेचा महत्त्वाचा टप्पा आहे. कामगार, शेतकरी, महिलांचा संघर्ष अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी ऐक्य नवे वळण देईल. देशात लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि फॅसिझम विरोधातील लढ्याला एक सशक्त दिशा मिळेल, असं या विलयाकडे पाहिलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT