Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Protest : वकिलांचा गोंधळ पाहून थोरात, तांबे आणि जगतापही झाले अचंबित

Pradeep Pendhare

Ahmednagar Latest News :

वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने आलेल्या नगरच्या वकिलांनी मोठा गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार उघडण्यासाठी खोलो खोलो... प्रवेशद्वार खोलो... घोषणा देत प्रवेशद्वारावर जोरात धक्के दिले. या वेळी हातातील पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या.

काही बहाद्दर पुरुष व महिला वकिलांनी चक्क प्रवेशद्वारावर चढून पलीकडे उतरण्याचा प्रयत्न केला. यामुळे काहीसा गोंधळ उडाला होता. एवढा गोंधळ होऊनही पोलिसांनी गेट उघडलेच नाही. अखेर निवडक वकिलांचे शिष्टमंडळ मागण्यांचे निवेदन घेऊन जिल्हाधिकार्‍यांना भेटण्यास गेले.

राहुरीत निर्घृण खून झालेल्या राजाराम व मनीषा आढाव वकील दाम्पत्याच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, आरोपींविरुद्ध मोक्काअन्वये कारवाई करावी, वकील संरक्षण कायदा लागू करावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील वकिलांनी आज नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या कार्यालयाचे मुख्य गेट बंद असल्याने वकील आक्रमक झाले. महिला वकिलांसह अनेक वकील गेटवर चढले व त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने बाटल्या फेकल्या. या मोर्चामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, अपक्ष आमदार सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) आमदार संग्राम जगताप सहभागी होते. हा प्रकार पाहून तेही अचंबित झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कार्यालयाच्या गेटवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. बंदोबस्त तैनात होता. मात्र, पोलिस अल्पसंख्येने होते. सर्व वकिलांना जिल्हाधिकारी कार्यालयात जायचे होते व त्यासाठी ते आक्रमक झाले होते. काहींनी गेटच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या, महिला वकिलांसह अनेकजण गेटवर चढले व त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या. हे पाहिल्यावरही पोलिसांनी गेट उघडले नाही.

नंतर प्रत्येक तालुक्यातील वकील संघटनांच्या निवडक पदाधिकार्‍यांना प्रवेश दिला. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेतली. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यावर वातावरण शांत झाले. आमदार सत्यजित तांबे यांनीही नंतर मोर्चेकरी वकिलांची भेट घेतली.

महाराष्ट्रात वकील संरक्षण कायदा करावा, राहुरीतील गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालय पुढे चालावा, खटला चालवण्यासाठी सरकारतर्फे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशाही मागण्या मोर्चेकरी वकिलांनी या वेळी केल्या.

edited by sachin fulpagare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT