bajirao khade emotional sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kolhapur Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवांना अश्रू अनावर; बंडखोरी करत स्थानिक नेत्यांना दिला इशारा

Rahul Gadkar

सांगली लोकसभा मतदारसंघात ( Sangli Lok Sabha Election 2024 ) महाविकास आघाडी आणि काँग्रेसमध्ये मतभेद सुरू होते. त्यानंतर आता कोल्हापुरातही काँग्रेसमध्ये ठिणगी पडली आहे. गेल्या दोन वर्षांपासून तयारी करत असलेले काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे ( Bajirao Khade ) यांनीदेखील बंडखोरी केली आहे. आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत खाडेंनी शुक्रवारी ( 19 एप्रिल ) कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून ( Kolhapur Lok Sabha Election 2024 ) उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरताना खाडेंनी स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनादेखील इशारा दिला आहे.

"माझ्यावर दबाव टाकण्याचं काम सुरू आहे. पण, प्रत्येक गोष्टीला अंत असतो. दबावालादेखील अंत आहे. ही न्यायाची लढाई आहे. न्याय देण्याची भाषा कुठून होणार असेल तर विचार केला जाईल. दबावाला कधीही मी बळी पडणार नाही. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून 28 वर्षे काम करतोय. ती विचारधारा आमच्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही," अशा शब्दांत बाजीराव खाडेंनी काँग्रेसच्या ( Congress ) स्थानिक नेत्यांना इशारा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"28 वर्षे काँग्रेससोबत एकनिष्ठ राहून पक्षाचे काम करत आहे. दोन वर्षांपासून कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे. काँग्रेसकडून मी उमेदवारी मागितली होती. ज्यावेळी तिकीट वाटपाची चर्चा झाली, तेव्हा मला विचारात घेतलं नाही. सर्वसामान्य कुटुंबातला असल्यानं माझी योग्यता नाकारली गेली. या निर्णयामुळे काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. आमच्या कार्याचे मोजमाप झाले नाही, काँग्रेसच्या स्थानिक आणि राज्यातील नेत्यांनी स्वाभिमान दुखावला आहे. मात्र, स्वाभिमानी कार्यकर्त्याच्या पाठीमागे ही जनता असते, ही माझी एकट्याची लढाई नाही," असं म्हणत खाडेंनी जनमत विचारात घेण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचं सांगितलं.

"काँग्रेसबरोबर माझे ऋणानुबंध आहेत, ज्या पक्षासोबत 28 वर्षे काम केलं त्यांच्याकडूनच मला थांबण्यासाठी सांगितलं जातंय, त्या नेत्यांच्या बाबतीत मी काय बोलावं? ही स्वाभिमानाची लढाई आहे. ती लढली पाहिजे. लोकशाहीचे मूल्य काँग्रेस पक्षाचा मुख्य आधार आहे. जर तिकीट वाटपात लोकशाही म्हणून आम्हाला विचारात धरलं, नसेल तर पक्षाच्या विचारधारेमधून निवडणूक लढवावी लागेल," असं खाडेंनी म्हटलं.

"जी मूळ काँग्रेस आहे, तिला बेदखल केलं जात आहे. वर्षभरापूर्वी काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण होते. मात्र, स्थानिक आणि राज्यातील नेत्यांनी त्याचे आकलन केले नाही. वरिष्ठ नेत्यांनी माझ्या उमेदवारीबाबत सांगितले होते. पण, स्थानिक आणि राज्यातील नेत्यांनी माझी उमेदवारी डावलली. तिकीट वाटपाची प्रक्रिया पुन्हा एक दोन माणसाच्या प्रभावाने चालली नसली पाहिजे. काँग्रेसच्या मूल्यांना धरून ही प्रक्रिया होत नाही," अशी खंत खाडेंनी व्यक्त केली.

( Edited By : Akshay Sabale )

  • R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT